‘तुम लढो, हम कपडे संभालते’, लेखी आश्वासनाविना बेमुदत उपोषणाची बोळवण!

Akola News: Indefinite hunger strike without written assurance!
Akola News: Indefinite hunger strike without written assurance!

शिरपूर (जि.वाशीम) : स्थानिक वार्ड क्रमांक तीन मधील अरिहंत शाळेजवळ गटारगंगा साचलेली आहे. त्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पत्रकार शंकर वाघ यांनी १० सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते. परंतु शनिवारी (ता.१२) उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी अनपेक्षितपणे उपोषणाची सांगता करण्यात आली.


ग्राम पंचायत प्रशासनाच्यावतीने मुख्य मागणी पावसाचे व सांडपाण्याची विल्हेवाट लावणे व येणे ३४ नुसार सुविधा उपलब्ध नसतील तिथे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवा, या मुख्य दोन मागण्या वगळता इतर दुय्यम मागण्या प्राधान्य क्रमाने आर्थिक स्थिती विचारात घेऊन पुढील काळात पूर्ण करण्यात येतील असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

अरिहंत शाळेच्या स्वयंपाक घराजवळ साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वृत्तपत्रांची पाने रंगवली गेली. कॉलनीवासीयांनी मंत्रालयापर्यंत निवेदने दिली. परंतु सांडपाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे पत्रकार शंकर वाघ यांनी १० सप्टेंबरपासून स्थानिक ग्रामपंचायत समोरच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.

अरिहंत शाळेनजिक साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, या मुख्य मागणीसह नळाला तोट्या लावणे, विना परवाना बांधकामांची चौकशी करणे, नाल्या, रस्ते, स्ट्रीटलाईट व पाणी पुरवठा इत्यादी सुविधा नसलेली प्लॉटींग विक्री थांबवणे, इत्यादी दुय्यम मागण्या सुद्धा शंकर वाघ यांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.

उपोषणकर्ते प्रशासनाला वठणीवरच आणणार व ओंकार कॉलनी समस्यामुक्त करणार, अशा चर्चा सुद्धा शहरात रंगायला सुरुवात झाली होती. परंतु शनिवारी अनपेक्षितपणे पत्रकार शंकर वाघ यांनी ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता केली. प्रशासनाच्यावतीने उपोषणकर्ते शंकर वाघ यांना कोणतेही लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

‘तुम लढो, हम कपडे संभालते’
ओंकार नगरी ही शहरातील बुद्धीवान लोकांची कॉलीनी म्हणून ओळखली जाते.परंतू या कॉलीनीतील बुद्धीवान लोकांनी उपोषणाबाबत ‘तुम लढो, हम कपडे संभालते’ अशी तटस्थ भूमिका घेतली आणि तिथेच घात झाला. कॉलनीसाठी झगडणारे उपोषणकर्ते शंकर वाघ एकाकी पडले व उपोषण फसले, असे विश्लेषण शहरातील जाणकार मंडळीकडून केले जात आहे.

प्रशासनाच्यावतीने उपोषणकर्त्यांना मुख्य मागणी वगळता ग्रामपंचायत स्तरावरील इतर मागण्या प्राधान्य क्रमाने, आर्थिक बाब लक्षात घेऊन पुढील काळात सोडवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
- भागवत भुरकाडे, ग्रामविकास आधिकारी, ग्रा.पं.शिरपूर जैन

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com