अकोला : अपूर्ण बॅरेजेससाठी राज्यपालांना साकडे

प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जलसिंचन संघर्ष समितीचा पुढाकार
Akola incomplete barrages work
Akola incomplete barrages worksakal

अकोला : पूर्णा व तिला मिळणाऱ्या नद्यांवरील खारपानपट्टा भागात असलेली गोड्या पाण्याची समस्या निकाली निघावी याकरिता, या भागात मोठ्या प्रमाणात बॅरेजेस निर्मिती गरजेची आहे. परंतु, वर्षोगणती संघर्षानंतरही शेतकरी व येथील नागरिकांच्या हिताचा हा प्रश्‍न निकाली निघालेला नाही. त्यामुळे आता, या विषयाची कमान स्वतः राज्यपालांनी हाती घ्यावी व एका वर्षात जिल्ह्यातील अपूर्ण असलेले बॅरेजेस पूर्णत्वास न्यावेत तसेच गरजेनुसार नव्या बॅरेजेसची निर्मिती करावी, असे साकडे जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदी व तिला मिळणाऱ्या नद्यांवरील खारपानपट्यातील, जिथे गोड्या पाण्याची टंचाई आहे, तेथे २००९ ला सुरू होऊन २०१२ ला पूर्ण होणारी बॅरेजेस अजूनही अपूर्ण आहेत. काहींची कामे अजूनपर्यंत सुरुच झालेली नाहीत. या समस्येला वाचा फोडण्यासाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सभा घेतली.

या सभेतच अकोला जलसिंचन संघर्ष समितीची स्थापना झाली. या समितीच्या संघर्षामुळे कामे सुरू व्हायची परंतु, काही कालावधीनंतर पुन्हा ती बंद पडायची. मुख्यमंत्र्यांकडूनही दाद मिळाली नाही तेव्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन राज्यपालांना भेटून सर्व बॅरेजेसची माहिती दिली व त्यांची गरज लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी सत्यता तपासून नेरधामणा, पूर्णा बॅरेज नं.२ वर स्वतः येऊन बॅरेजेसच्या कामाचा शुभारंभ केला. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा काम बंद पडले.

आता पुन्हा महामहिम राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या हितासाही बॅरेजेसच्या निर्मितीची कमान हातात घ्यावी. महाराष्ट्र सरकारव भारत सरकारकडून, परिसरात खारपानपट्ट्यातील जेथे गोडे पाणीच नाही तेथील अपूर्ण बॅरेजेस व जी बॅरेजेस सुरू झाली नाही, ती पावसाळा संपल्याबरोबर सुरू करावीत व एका वर्षाच्या आत पूर्णत्वास न्यावीत, असे आवाहन अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना निवेदनाद्वारे केले आहे.

नद्या विषमुक्त कराव्या

ज्या नद्यांवर ही बॅरेजेस आहेत, त्या नद्यांमध्ये दूषित, विषारी पाणी येत आहे. हेपाणी मानव, जनावरे व शेतीलाही घातक आहे. त्यामुळे या नद्यामध्ये येणारी दूषित, विषारी पाणी त्वरीत बंद होण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी सुद्धा महादेवराव भुईभार यांनी निवेदनातून केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com