तरोडा : अकोट तालुक्यातील तरोडासह कावसा, रेल, धारेल, गिरजापूर या गावांना १२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. परिणामी भर उन्हात नागरिकांना पाण्यसाठी भटकंती करावी लागते. ज्या गाव तलावात शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेतात, कुत्रे पाणी पितात तेच पाणी नाईलाजाने तरोडा येथील नागरिकांना दैनंदिन वापरासाठी आणावे लागत आहे. त्यामुळे लहान बालकांसह इतरांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तरोडा गावाला वान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. अकोट वरून जऊळका मार्गे पाणी पुरवठ्याची पाईप लाईन आली आहे. यामध्ये सर्वात मागचे गाव तरोडा असल्याने त्यांना १२ दिवसाआड गावात रात्रीबेरात्री पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कोणाच्या हाती पाणी येते, तर कोणाच्या पदरी निराशच येते. त्यातही काही नागरिकांच्या घरी पाणी साठवून ठेवण्यासाठी पुरेशे साहित्य नसल्याने त्यांना पाणी साठवून ठेवण्यास अडचण होते. परंतु, हेच पाणी १२ दिवस एका भांड्यात साचून ठेवल्याने ते पिण्यायोग्य राहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ज्या नागरिकांजवळ पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही, अशांना गावानजीक असलेल्या गाव तलावातील पाणी दैनंदिन वापरासाठी आणावे लागते. तलावात शेतकरी जनावरे पाणी पाजण्यासाठी नेतात, कुत्रेही मनमोकळ्याने पाण्यात पोहतात आणि हेच दूषित पाणी नागरिकांना नाईलाजाने आणावे लागत आहे. ग्रामस्थांच्या समस्यांबाबत सरपंचानी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधी व इतरांना निवेदने देऊन समस्या मार्गी लावण्याची विनंती केली, बैठका घेतल्या तरी देखील ग्रामस्थांच्या समस्या नाही सुटल्या. त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.
व्हॉलवरील नळही बंद
तरोडापासून तीन किलोमीटवर असलेल्या कुटासा फाट्यावर व्हॉलवर असलेल्या नळावर ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी जात होते. परंतु, काही हेकरेखोर अधिकाऱ्यांमुळे तोही नळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता गत दोन वर्षांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
१२ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता चार ते पाच दिवसांवर करण्याचे प्रयत्न करणार आहे.
- आर.एन. इंगळे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, अकोट.
पाण्याचे कुढल्याच प्रकारचे नियोजन नसल्यामुळे इतर गावात दर तीन-चार दिवसआड पाणीपुरवठा केला जातो, पण आमच्या गावात १२ दिवसांवर पाणी मिळते. याबाबत वरिष्ठांकडेसह लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली, निवेदने दिली, पण काहीच फायदा झाला नाही.
- विलास साबळे, सरपंच, तरोडा.
पीएससीमध्ये रोजच रुग्ण येतात. सर्वांना पोटदुःखी, हगवण, मळमळ करणे, गळा दुखणे इत्यादी आजाराचे लक्षणे असतात. तपासणी केल्यानंतर दूषित, खारे पाणी, साठवून ठेवलेल्या पाण्याचा वापर करत असल्याने ग्रामस्थ आजारी पडत आहेत. बऱ्याच रुग्णांचे रक्त तपासणी केली असता, त्यांना पाण्यामुळे त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले.
- मुस्तफा देशमुख, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी, कावसा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.