Akola News : बाळापूर तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान; अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला फटका

शेतकऱ्यांसाठी आणि खरीप हंगामासाठी एका प्रकारचा कर्दनकाळच ठरला.
agriculture
agriculture sakal

बाळापूर - तब्बल एक महिना उशिराने आलेला पाऊस आणि पेरणीनंतर झालेली अतिवृष्टी. यामुळे यंदाचा पावसाळा बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणि खरीप हंगामासाठी एका प्रकारचा कर्दनकाळच ठरला आहे. अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून, ही तूट भरून करण्यासाठी रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.

यंदा अकोला जिल्ह्यासह बाळापूर तालुक्यात उशिराने पेरणी झाली आहे आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहाही मंडळात अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका खरिपाच्या पिकाला बसला.

agriculture
Akola News : नवीन मालमत्ता खरेदी केली आहे, वीज बिल तपासा! अन्यथा...

खरिपाचे निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र पावसामुळे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीच्या हंगामावर राहणार आहे. खरिपामध्ये झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

agriculture
Akola : जिल्ह्यात पावसाची शक्यता; नदीकाठच्या गावांना इशारा

तालुक्यात शेतशिवारातील पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून पूर्ण झाले आहेत. एकूण नुकसानीचे आकडे प्रशासनाकडून सांगण्यात येणार आहेत. तालुक्यात ६० हजार ६७४ हेक्टर पैकी ५७ हजार ८७२ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. गत वर्षी ५९ हजार ३०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. तब्बल एक महिना उशिरा झालेल्या पावसामुळे यंदा पेरणीला विलंब झाला. सध्या तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली आहे.

agriculture
Akola News : चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळतात तेव्‍हा...

तालुक्यात सात मंडळे असून, यापैकी सहा मंडळामध्ये ५७ हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून, ३१ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांनी दिली.

मूग व उडीद पिकांबरोबर तुरीचेही नुकसान

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांबरोबर तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव पडत आहे.

जलस्रोतांना झाला फायदा

यंदा जुलैपासून बाळापूर तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले. मात्र, जलस्रोतांना निश्चितच फायदा झाला आहे. तालुक्यातील लघु, मध्यम जलाशयांपासून ते शेतातील विहिरी, बोअरवेलच्या जलपातळीत वाढ झाली आहे.

यंदा बाळापूर तालुक्यातील सहा मंडळात पाऊस अधिक प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. वरिष्ठांशी बैठक घेण्यात येणार आहे. आणि त्यानंतर पीक नुकसानीचा आकडा निश्चित करण्यात येणार आहे.

- दत्तात्रय काळे, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर.

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • कापूस : १४,४७०

  • सोयाबीन : ३१,४६५

  • तूर : १०,४६५

  • उडीद : ५५९

  • मूग : ५१८

  • ज्वारी : ९१

  • इतर : ३१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com