Buldhana Weather Update: उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

खळखळणारे नदीनाले, पाण्याने तुडुंब भरलेले डोह, झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह, किलबिल करणारे पक्षी, कोकिळेचे मंजुळ गाणे, मोरांची म्यॉंव म्यॉंव, वृक्षवल्लींमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असे दृष्य आज रानावनात पाहायला मिळत नाही.
buldhana weather update heat wave water shortage forest animal
buldhana weather update heat wave water shortage forest animalSakal

नांदुरा : खळखळणारे नदीनाले, पाण्याने तुडुंब भरलेले डोह, झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह, किलबिल करणारे पक्षी, कोकिळेचे मंजुळ गाणे, मोरांची म्यॉंव म्यॉंव, वृक्षवल्लींमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असे दृष्य आज रानावनात पाहायला मिळत नाही.

कारण, निसर्गातील ''जीवन'' म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा ''पाणी'' नावाचा घटक आटल्याने जंगलात पाण्यासाठी जणूकाही ''लॉकडाऊन'' सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे. पाण्यासाठी बिबट्या व वानरसेनेसह वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत आहेत.

चैत्र महिन्याच्या रखरखत्या ऊन्हामुळे मानवासह वन्यप्राण्यांचा जिव लाहीलाही होत असुन सूर्याने कमालीची आग ओकणे सुरू केले आहे. निसर्गातील नदी, नाले, जलस्रोत आटले आहेत. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील पुर्णा ज्ञानगंगा, विश्वगंगा, केदार या नद्या उशाला तरीही कोरड घशाला अशी अवस्था सद्या झाली आहे. जंगलात पाणवठ्याचा अभाव आहे व या पाणवठ्याअभावी वन्यजीवांमध्ये ''लॉकडाऊन'' सुरू असल्याचे चित्र आहे.

पाणी मिळेल या आशेने वन्यप्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यात काही हिंस्र प्राण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष उद्‌भवू शकतो. हे वन्यप्राणी गावाकडे येऊ नये, यासाठी तालुक्यातील अरण्यात पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पाणवठ्यांअभावी जंगलात ''लॉकडाऊन'' झाले असल्याने तहानेने व्याकूळ वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उन्हामुळे नदिनाल्यांसह जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व पक्षी शेतशिवाराकडे येत आहेत. शेतात असलेले रब्बी व उन्हाळी पिकेही संपुष्टात आले आहेत. प्राणी व पक्षी गावालगतच्या शेतवस्तीकडे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राण्यांची शिकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

बिबट्याचाही मुक्त संचार, जनता भयभीत

वन विभागाने तालुक्यातील पहाडी क्षेत्रात नियोजन करून वन्यप्राण्यांकरीता पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे. तालुक्‍याच्या चहूबाजूंच्या जंगलात हरिण, काळवीट, मोर, लांडोर, ससे, रानडुक्कर, वानर व इतर जंगली प्राणी आहेत.

तर काही जंगलात काळवीट व हरणाचे कळपच्या कळप दृष्टीस पडतात. अनेक भागात तर बिबट्याचा मुक्त संचार जनता अनुभवत असून त्यामुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाण्या अभावी हे प्राणी गाववस्तीकडे कूच करीत आहे.

वनविभागाने त्वरित पाणवठे तयार करावेत

दरवर्षी वनविभागाकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जंगलात वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जात नाहीत. पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. तरी वनविभागाने त्वरित ॲक्‍शन मोडमध्ये येऊन कृत्रिम पाणवठे तयार करावेत. वन्यप्राण्यांसह पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com