
तीन मुलांच्या हत्येच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या बापाची आत्महत्या
अकोला : स्वतःच्या तीन मुलांच्या खुनाच्या आरोपातून न्यायालयाने २९ जून रोजी निर्दोष सोडलेल्या बापाने दुसऱ्याच दिवशी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोतर्डी येथे शुक्रवारी (ता. १) घडली.अकोला जिल्ह्यातील धोतर्डी गावात १० मे २०१८ रोजी विष पाजून पोटच्या तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप वडिलांवर होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली. सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपी वडिलाची निर्दोष सुटका केली. मात्र, कारागृहातून सुटताच वडिलाने आत्महत्येच धक्कादायक पाऊल उचलले. विष्णू दशरथ इंगळे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
धोतर्डी गावात घडले होते तिहेरी हत्याकांड
बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धोतर्डी हे गाव १० मे २०१८ रोजी तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. विष्णू दशरथ इंगळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने नैराश्यातून त्यांनी स्वतःचे तीन मुलं १७ वर्षीय अजय इंगळे, १५ वर्षीय मनोज इंगळे आणि १२ वर्षांची मुलगी शिवानी यांना विष पाजले होते. वरून वरवंट्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली असल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आरोपी निकाल लागेपर्यंत कारागृहात होता.
Web Title: Crime In Akola Murder Of Three Children Innocent Father Suicide
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..