Bachchu Kadu
Bachchu Kadusakal

शेत रस्त्यांवर माती, पेरणी करणार कशी?

आमदारांचा प्रश्न; पालकमंत्र्यांनी बोलावली १६ मे रोजी विशेष बैठक
Published on

अकोला : शेतकऱ्यांना शेतातील मालाची वाहतूक करता यावे, पावसाळ्यातही शेतीचे कामे करताना बांधपर्यंत पोहोचता यावे या उद्देशाने मोठ्याप्रमाणावर जिल्ह्यात शेत रस्ते व पांदण रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र, हे खोदून त्यावर केवळ मातीच टाकण्यात आल्याने पावसाळ्यात पेरणी करावी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबत खरीप आढाव बैठकीत आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर सोमवार, ता. १६ मे रोजी विशेष बैठक घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी मंगळवारी (ता.१०) केली.

जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात सन २०२२-२३ च्या खरीप हंगाम नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपवनसंरक्षक के.आर. अर्जुना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी व शेतकरीही उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी डॉ. कांताप्पा खोत यांनी मागील सभेचे इतिवृत्त व खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. त्यानंतर आमदारांनी खरीप हंगामात केलेल्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले. खरीपात बियाणे उलब्धतेबाबत चर्चा सुरू असताना आमदार भारसाकळे यांनी पांदण व शेत रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. हे रस्ते खोदून त्यावर माती टाकल्याने पावसाळ्यात त्यावर चिखल होणार. अशा परिस्थितीत शेतापर्यंत पोहोचून पेरणी कशी करणार असा प्रश्न यांनी उपस्थित केला. मात्र, संबंधित यंत्रणेचे कोणतेही अधिकारी, कर्मचारी आढावा बैठकीला नसल्याने याबाबत ता. १६ मे रोजी विशेष सभा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीतच जिल्ह्यात जैविक, सेंद्रीय शेतीबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना रासायनिक खताचा पर्याय उपलब्ध करून देताना पर्यायी खते व निविष्टा कोणत्या याबाबत मार्गदर्शन करण्याबाबत कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, अशी विचारणा आमदारांनी केली. त्यावर कृषी विभाग, जैविक मिशन, डॉ. पंदेकृवि आणि जिल्हा प्रशासनाने मिळून नियोजन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

खरीप पेरणी हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचे मुद्दे

  • जिल्ह्यात सन २०२२-२३ या खरीप हंगामासाठी चार लाख ८३ हजार ५०० हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन.

  • सोयाबीन दोन लाख २० हजार हेक्टर, कापूस एक लाख ६० हजार हेक्टर, तूर ५५ हजार हेक्टर, मूग २३ हजार तर उडीद १६ हजार हेक्टर.

  • मुबलक खते व बियाणे उपलब्ध असल्याने टंंचाई जाणवणार नाही. एप्रिल-मेमधिल नियत खताचा साठा उपलब्ध झालेला नाही.

  • थेट बांधावर खत पुरवठा करण्याचे नियोजन. गत वर्षी ३३३ शेतकरी गटांमार्फत १३ हजार ३०९ शेतकऱ्यांना लाभ.

  • भेसळ काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके जिल्हा व तालुकास्तरावर सज्ज.

  • खरीप हंगामकरिता एक हजार ३७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्यांक. आतापर्यंत २८२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप.

  • पीक विम्यासंदर्भात प्रचार, प्रसार करम्याचे निर्देश

  • उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ६५२ शेतीशाळा घेण्याचे नियोजन असून, त्यात ११७ महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.

बीज प्रक्रिया स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार

खरीप आढावा बैठकीत खरीप हंगाम २०२१ मध्ये बीज प्रक्रिया स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यात अंजली वैभव देशमुख (रा. भांबेरी ता. तेल्हारा), नागोराव जनार्दन ताले (रा. दिग्रस खु. ता. पातुर), राम माणिकराव फाळे (रा. तामसी ता. बाळापूर) या शेतकऱ्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com