पक्षनिष्ठेच्या पालख्यांनी जडावली पावले

भाजप निष्ठावंतांची व्यथा: संधी मिळण्याचे निकष काय?
BJP
BJPesakal

वाशीम - जनसंघ ते भारतीय जनता पक्ष, आणीबाणीतील कारावास ते पंचतारांकित सत्ता हा प्रवास करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला निष्ठावंतांचा विसर पडला कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आदेशाबरहुकूम आंदोलन असो कि पक्षकार्य करणारे कार्यकर्ते पालखीचे भोई ठरत असून त्यांचे पाय थकण्याआधी उतराई होण्याची भावना पक्षात निर्माण झाली नाही तर बाहेरून पक्षात आलेल्यांच्या भरवशावर पक्ष तगणार का असा प्रश्न जून्या कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यामधे जनसंघाच्या काळाआधी अनेकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवत वैचारिक कार्याला वाहून घेतले होते. जनसंघाच्या काळात प्रचंड मनस्ताप व हेटाळणी सहन करत अनेकांनी विचाराची मशाल तेवत ठेवली. जुन्या काळात तुळशीरामजी जाधव, अण्णासाहेब पनवेलकर, डॉ.डबीर, नानासाहेब पाठक, भास्करराव रंगभाळ, उमाकांत चौधरी, अण्णा मादसवार शंकरराव कोकास, प्रा.दिलीप जोशी सुरेश माहूले या मंडळींनी जिवाचे रान करीत जनसंघ ते भाजप या प्रवासात आपले योगदान दिले. याच जिल्ह्यात भाजपचे आमदार म्हणून लखन मलिक यांनी चार वेळा कॉंग्रेसचा गड सर केला तर माजी आमदार विजय जाधव यांनी सध्याही कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला रिसोड विधानसभा मतदारसंघाला तब्बल दोन वेळा सुरूंग लावला होता.

भाजप हा शहरी तोंडवळ्याचा पक्ष ही प्रतिमा आमदार लखन मलिक व माजी आमदार विजय जाधव यांनी पुसून गावखेड्यातील वाडी वस्त्यावर पक्ष पोचविला. आज केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. या निष्ठावंतांच्या खांद्यावरील पालखीचा भार कमी होईल अशी अटकळ असताना भाजपची कॉंग्रेस होत असल्याचे चित्र समोर येत आहे. माजी आमदार विजय जाधव यांनी झनक घराण्याच्याच्या दोन पिढ्याचा वारसा मोडीत काढत मेडशी विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या खाती जमा केला होता. युवक आघाडी ते पक्षाच्या बांधणीत मोलाचे काम करणारे विजय जाधव यांचा पक्षाला विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मात्र त्यांना शिपींग कार्पोरेशनचे संचालकपद देवून जाधव घराण्याची पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेतली असली तरी विजय जाधव यांच्यासारख्या नेत्याला जनसंपर्काचे पद देण्यास पक्ष अपयशी ठरला मध्यतरी विधान परिषद निवडणुकीत माजी आमदार विजय जाधव यांची वर्णी लागेल अशी अटकळ होती मात्र ती फोल ठरली. आमदार लखन मलिक यांनी तब्बल चार वेळा वाशीम विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या खाती जमा केला.

तळागाळातील कार्यकर्त्यांचा आपला माणूस अशी लोकउपाधी असलेल्या लखन मलिक यांची पक्षाने काय दखल घेतली हा प्रश्न आता समोर येत आहे. दुसऱ्या पक्षात हयात घालविलेले नेते भाजपात आल्यानंतर एका रात्रीत मंत्री होतात रूबाबात लाल दिव्याच्या गाड्या मिरवतात असे घडत असताना लखन मलिक यांच्यासारखा अल्पसंख्याक मेहतर समाजातील नेत्याचे पक्षकार्य भाजप विसरली काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात भाजपला शहरातून गावात नेण्याचे काम माजी आमदार विजय जाधव, मारोतराव लादे, सुरेश लुंगे या बहुजन समाजातील नेत्यांनी केले. या नेत्यानंतर आजही ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी तन मन धनाने गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे नेते म्हणून राजू पाटील राजे यांची ओळख आहे. प्रचंड जनसंग्रह, पक्षासाठी वाटेल ती त्याग करण्याची समर्पन वृत्ती असताना पक्ष राजू पाटील राजे यांची दखल घ्यायला कोणता मुहूर्त शोधत आहे हे न उलगडणारे कोडे झाले आहे. पक्षाचा बहुजन समाजातील लोकप्रिय चेहरा असलेल्या कार्यकर्त्यांनी फक्त पालखीचे भोईच व्हायचे काय असा प्रश्न निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांत विचारला जात आहे.

यापेक्षा काँग्रेस बेहत्तर

सध्या देशात व राज्यात कॉंग्रेस तोळामासा ठरली आहे. मात्र तरीही पक्षनिष्ठा जोपासणार्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसने कधीच अडगळीत टाकले नाही. संधी उपलब्ध झाली तर जुन्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम कॉंग्रेस नेतृत्वाने केले आहे. भाजपमधे मात्र आता इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनी पक्ष हायजॅक केला आहे. पक्षाला कार्पोरेट बनविण्याच्या नादात निष्ठावंत डावलले जात आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेस बेहत्तर अशा भावना व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com