Navratri : भक्तांचे आराध्य दैवत विराहितची माता तुळजाभवानी

नवरात्रोत्सवात जागरण, व्रत, उपवास, होमहवनादी सुरू ; हवा पर्यटन स्थळाचा दर्जा
navratri
navratrisakal

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र विराहितची तुळजाभवानी तुळजापूरच्या भवानीचे प्रतिरूप मानल्या जाते, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या या आदीशक्ती तुळजाभवानीवर भक्तांची अपार श्रद्धा आहे.

मूर्तिजापूर पासून १८ किलोमीटर व पिंजरहून १० किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र विराहीत वसले आहे. विराहीतच्या तुळजाभवानीचे मंदीर निसर्गरम्य परीसरात आहे. मंदीराबाहेरील देवतांच्या मूर्ती बघितल्यानंनंतर त्या मोघल काळातील असल्याची साक्ष पटते. २०० लोकवस्तीच्या विराहीत गावाच्या पूर्वेला मंदीर आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी या परीसरातील तलाव फुटून त्याला नदीचे रुप प्राप्त झाले आहे. मंदीरासमोरच तळ्याची भींत आहे. या भिंतीला लागून असलेले सीताफाळाचे वन मात्र आजमितीस नामशेष झाले आहे.

मंदिराच्या बाजुला शंकरभारती महाराजांची समाधी आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारात कै. चिंतामण राऊत यांनी लावलेली ब्रम्हा, विष्णू, महेश रुपातील वड, पिंपळ, उंबराची त्रिवेणी असून या महाकाय वृक्षांनी एक हजार फूट जागा व्यापलेली आहे. लगतच महादेवाचे मंदीर, तुळस, झोलेबाबांचे अधिष्ठान, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर आहे. पाच वडांची झाडे या परीसराला निसर्गरम्यता प्रदान करतात.

नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला रात्री ९ च्या दरम्यान घटस्थापना केली जाते. नऊ दिवस देवीला आंघोळ घालणे बंद असते. सकाळ संध्याकाळ ६ वाजता आरती, काकडा आरती. सकाळी भागवत व रात्री किर्तनाची परंपरा आजही सुरू आहे.

मनोहर किडे यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार त्यांचे पणजोबा त्याकाळी नित्यनेमाने आपल्या कुळदैवताच्या दर्शनाला बैलगाडीने तुळजापूरला जात असत. वृद्धापकाळात त्यांनी या नित्यनेमाबाबत नतमस्तक होऊन असमर्थता दर्शविली. देविने सोबत येण्याचा दृष्टांत त्यांना स्वप्नात दिला. मागे वळून बघितल्यास तिथेच थांबेन, असा इशाराही दिला. दृष्टांताची सत्यता तपासून बघण्याच्या उत्सूकतेपोटी विराहीत गावाजवळ त्यांनी मागे वळून बघीतले अन् देवी दर्शन देऊन लूप्त झाली. तिथेच देविची प्रतिष्ठापना झाली.

गेली १९ वर्षे देवीसमोर अखंड दीप सुरू आहे. नामदेव राऊत, साहेबराव राऊत, यशवंत राऊत यांच्या पुढाकारातून व भक्तांच्या योगदानातून सभागृह निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण राऊत यांनी चार एकर जमीन दान दिली आहे. सध्या गणेश राऊत संस्थानचे अध्यक्ष आहेत.

चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आणि नवरात्रौत्सवात हजारो भक्त दर्शनाला येतात, त्यामुळे धार्मिक पर्यटन स्थळाचा दर्जा या शक्तिस्थळाला मिळावा, अशी ग्रामस्थ व भक्तांची मागणी आहे. ५० ते ६० वर्षांपूर्वी येथे बोकड बळीची प्रथा होती. कै.महादेवराव राऊत व बाबन साधूबुवा यांनी देविला बोकडबळी देण्याची अमानुष प्रथा बंद केली. आजही त्या निर्णयाचे तंतोतंत पालन होत आहे. मुक्या जीवाची आर्त हाक ऐकून त्यांच्या आयुष्याची दोरी देवादिकांच्या नावावार कापली जाणार नाही, हा विचार रूजवत बोकडबळीच्या अमानुष प्रथेला तिलांजली देणारे श्री क्षेत्र विराहित त्यामुळे आगळे शक्तिपीठ ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com