परतीच्या पावसाने झोडपले! कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरी

Rain
RainRain

अकोला : गेले दोन आठवड्यांपासून विश्रांती घेणाऱ्या मॉन्सूनच्या पावसाने परतीच्या मार्गात अकोला जिल्ह्याला शनिवारी (ता. १६) रात्रभर झोडपून काढले. कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरी रात्रभर सुरू होत्या. सर्वाधिक पाऊस पातूर तालुक्यात झाला तर तेल्हारा तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.

मॉन्सूनच्या पावसाने यावर्षी सरासरी केव्हाच ओलांडली होती. ऑक्टोबर महिना उजाडताच पावसाने उसंत घेतल्याने गेले दोन आठवड्यांपासून शेतकरी खरिपातील पिकांच्या सोंगणीला लागला होता. विशेषतः सोयाबीनची काढणी व कापूस वेचणी करण्यात शेतकरी गुंतला होता. विजयादशमीनंतर मात्र, मॉन्सूनच्या पावसाने परतीचा मार्ग धरला आणि जाताजाता अकोला शहर व जिल्ह्याला शनिवारी सायंकाळपासूनच चांगला तडाखा दिला.

Rain
देशाअंतर्गत तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढणे गरजेचे

तेल्हारा व अकोट तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या या पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापला. रविवारी पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. या पवसाने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. अकोला जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प आधीच ओव्हरफ्लो झाले असल्याने शनिवारच्या पावसानंतर जिल्ह्यातील सर्वं प्रकल्पातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी १० वाजेपर्यंतचा पाऊस

  • अकोट ः ३४.६ मि.मी.

  • तेल्हारा ः ४४.६ मि.मी.

  • बाळापूर ः ३४.९ मि.मी.

  • पातूर ः ५१ मि.मी.

  • अकोला ः ३५.७ मि.मी.

  • बार्शीटाकळी ः ३७.१ मि.मी.

  • मूर्तिजापूर ः ३७.२ मि.मी.

  • .................................

  • एकूण सरासरी ः ३८.३ मि.मी.

वान प्रकल्पातून विसर्ग

शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून रविवारी सकाळी ९.४५ वाजता विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाचे दोन वक्रद्वार ३० सेंटिमीटरने उघडून ५४.५१ घ.मी. प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Rain
पीसीबीने सुधारली ना‘पाक’ कृती; अखेर जर्सीवर टाकले भारताचे नाव

काटेपूर्णाचे दोन वक्रद्वार पुन्हा उघडले

अकोला जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलप्रकल्प असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन वक्रद्वार रविवारी पुन्हा उघडण्यात आले. जलाशय पातळी ३४७.७७ मीटर असून, उपयुक्त साठा ८६.३५ द.ल.घ.मी. आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपर्यंत ४३ मि. मी. पावसाची नोंद झाली. आधीच १०० टक्के प्रकल्प भरला असल्याने रविवारी सकाळी ७ वाजता पुन्हा दोन वक्रद्वार प्रत्येकी 30 से. मी. उघडून त्यातून ५१.१६ घ.मी. प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

मोर्णा नदीची पातळी वाढली

शनिवारी रात्रभर व रविवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसाने अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवारी सकाळी मोर्णा नदी दुथडी भरून वाहत होती. मोर्णा प्रकल्पाची पातळीही वाढली आहे. नदी पात्रात पाण्याची आवक वाढत आहे.

पिके पाण्याखाली, सोयाबीनच्या गंज्या ठेवल्या झाकून

दोन आठवडे विश्रांती घेतल्यानंतर परतीच्या मार्गात पावसाने अकोला जिल्ह्याला शनिवारी रात्रभर झोडपून काढले. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वत्र शेतात पाणी साचले असल्याने सोयाबीनसह कापूस, तूर पिकांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या सोयाबीनच्या गंज्या शेतातच पडून असल्याने त्या झाकून ठेवाव्या लागत आहे. शेतात पाणी साजल्याने सोयाबीनच्या गंज्याही पाण्याखाली आल्या आहेत.

रस्त्यांची दुरवस्था

जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग कंत्राटदारांनी खोदून ठेवले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर माती टाकून ठेवली आहे. त्यामुळे शनिवारच्या पावसानंतर पुन्हा या रस्त्यांवर चिखल झाला. त्यात वाहने रुतून बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होताना दिसत आहे. विशेषतः तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे रविवारी सकाळी वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com