ट्रॅफिक सिग्नल लावा अन्यथा अपघातांची हमी घ्या

अकोला व आंबेडकर चौकातील विदारक स्थिती
akola
akolasakal media

मंगरुळपीर : शहरातील अकोला चौक व आंबेडकर चौक या वदर्ळीच्या चौकात भरधाव वाहनामुळे केव्हाही मोठा अपघातात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही चौकात ‘ट्रॅफिक सिग्नल’ लावणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता पोलिस व पालिका प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे चित्र या चौकातून भरधाव वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांवरून दिसून येत आहे.

मंगरुळपीर शहरात रस्तेविकास महामंडळाने समेंट काँग्रेडचे सूशोभित रस्ते बनवले, शहरातून राज्य महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असतात. त्याबरोबरच शहरातील वाहनधारकांची सुद्धा रेलचेल असते. रस्ते विकास महामंडळाने शहरातील चौक मोठे करून स्ट्रीट लाईटसह दूभाजक सुद्धा बनविले आहेत. चौकातील रस्ते मोठे असल्याने सहाजिकच वाहनांची संख्या व गती जास्तच असते. परंतु, गतिमान वाहनांमुळे व शहरातील बेताल वाहतूक, जडवाहनांची होणारी गर्दी यामुळे कधीही आणि केव्हाही या चौकात मोठा अपघात होऊ शकतो, हे रास्तेविकास महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदार विसरले.

या दोन्ही चौकातून शहरातील नागरिकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. हीच परिस्थिती पादचाऱ्यांची सुद्धा आहे. सदर चौक ओलांडून कसे जावे असाही प्रश्न त्यांना पडत आहे. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही चौकात ‘ट्रॅफिक सिग्नल’ लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास व जीवितहानी झाल्यास रास्तेविकास महामंडळ जबाबदारी घेत असेल तर, त्यांनी ट्रॅफिक सिग्नल लावू नये असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील पोलिस व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत रास्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. परंतु, येथील पोलिस व पालिका प्रशासनाला सुद्धा शहरातील नागरिकांच्या जीवताचे काही देणेघेणे नाही काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात एकवटलेली बाजारपेठ, बसस्थानकावरील गाड्यांच्या फेऱ्या, जड वाहतूक व ऑटोचालकांच्या मनमानीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेताल वाहतुकीमुळे शहरात किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ‘ट्रॅफिक सिग्नल’ आवश्यक आहे. शहरातील बेताल वाहतूक आणि वाहतूक पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अपघातात वाढ होऊ शकते. जड वाहतुकीवर पोलिस प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. यात भरीस भर शहराची संपूर्ण मुख्य बाजारपेठ मध्यवर्ती भागात एकवटल्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसणे, चक्क रस्त्यावर अतिक्रमकांनी दुकान थाटणे तसेच मुख्य चौका-चौकात ऑटो चालकांनी व अवैध प्रवाशी वाहन धारकांनी निर्माण केलेले अवैध थांबे ही एक समस्या निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन, पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रास्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहार करून अकोला चौकात व आंबेडकर चौकात ‘ट्रॅफिक सिग्नल’ लावावे, अशीही मागणी येथील नागरिक करीत आहेत.

"रास्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील अकोला व आंबेडकर चौकात ‘ट्रॅफिक सिग्नल’ लावावे. जणेकरून शहरातील पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना या दोन्ही चौकातून ये-जा करताना अडचणी येणार नाही व अपघाताची भीती राहणार नाही. या दोन्ही चौकात ट्रॅफिक सिग्नल बसविने गरजेचे आहे. ट्रॅफिक सिग्नल बसविले नाहीतर, शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल."

- सचिन परळीकर, शिवसेना शहर प्रमुख, मंगरुळपीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com