वर्धा-नांदेड रेल्वेच्या कामाला वेग

दुसरा टप्‍पा सुरू; दिग्रसला अकराशे हेक्टर जमिनीचे संपादन
Wardha Nanded railway second phase work start
Wardha Nanded railway second phase work startsakal

दिग्रस : अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला वेग आला आहे. सध्या दुसऱ्‍या टप्प्यातील काम सुरू आहे. विदर्भ विकासासह यवतमाळ जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

प्राथमिक स्वरूपाच्या कामात रस्ते, नकाशे व आखणीचे काम झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामे म्हणजे रेल्वेरुळाचे स्थान निश्‍चित झालेल्या ट्रॅकवर खोदकाम, मातीकाम, दबाई आदी कामांना वेग आला आहे. या रेल्वे प्रकल्पाकरिता जवळपास १ हजार १४५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले असून, अतिरिक्त अंदाजे तीनशे हेक्टर जमिनीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. पावसाळ्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील काम म्हणजे आवश्यक ठिकाणी नदी व नाल्यांवरील रेल्वेपूल, गावे व शेतातील अंडरपास या कामांना सुरुवात होणार आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा रेल्वेप्रकल्प केंद्र सरकारने विशेष प्रकल्पात समाविष्ट केला असल्याने या प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भूप्रदेशाला जोडणाऱ्या या प्रकल्पाची मागणी अनेक वर्षांपासून होती. या परिसरातून रेल्वे झाल्यानंतर व्यापारासोबतच कृषी उद्योग व्यापारालासुद्धा चालना मिळेल. शिवाय नागपूर-मुंबईकडे जाताना आणि दक्षिणेला जाताना अनेक शहराचे अंतर कमी होणार आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर सात भुयारी मार्ग असतील. या प्रकल्पावर अंदाजे आठशे कोटी रुपये खर्च अनुमानित होता. परंतु, प्रकल्प पूर्ण होईल तोपर्यंत अंदाजे पाच हजार कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे.

या प्रकल्पाच्या वर्धा ते यवतमाळ पर्यंतच्या ७७ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे काम सेंट्रल रेल्वेकडून होणार आहे. तर यवतमाळ ते नांदेडपर्यंतच्या २०६ किलोमीटर अंतराचे काम रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात रेल विकास निगम च्या माध्यमाने केले जाणार आहे. या ट्रॅकवर एकूण चोवीस स्टेशन असतील. दिग्रस तालुक्यामध्ये दोन स्टेशन असतील त्यापैकी हरसुल या ठिकाणी स्टेशन असेल तेथून पोहरा देवी स्टेशनअर्थात वाईगौळ येथे स्टेशन देण्यात आले आहे. नवरात्री आणि रामनवमीच्या प्रसंगी या स्टेशनला यात्रा स्पेशल स्टेशन म्हणून वापरले जाईल. तेथून दिग्रस येथील ईसापूर या ठिकाणी मुख्य स्टेशन असेल.

पाठपुराव्‍याला यश

या प्रकल्पाची गरज पाहता परिसरातील ग्रामपातळीपासून मागणी केली जात होती. दिग्रस येथील जागरण जनमंच या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पाठविले होते. खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड यांच्यासह जिल्ह्यातील नेते व लोकप्रतिनिधींनीही सतत पाठपुरावा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com