चेन्नई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप लोकविरोधी राजकारण करत असून ईडीच्या माध्यमातून राजकारण करण्याची या पक्षाची इच्छा आहे, असे स्टॅलिन यांनी ट्विटरवरील व्हिडिओत म्हटले आहे.
‘ईडी’ने ऊर्जामंत्री बालाजी यांना अटक करताना चुकीची वर्तणूक देत त्यांच्यावर मानसिक दडपण निर्माण केले. त्यामुळे, बालाजी यांची प्रकृती बिघडल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला. ते पुढे म्हणाले, की ईडीने सेंथिल बालाजी यांना किती त्रास दिला, याची सर्वांना कल्पना आहे. निर्लज्जपणे राजकीय सूड उगविला जात आहे, याबाबतही कोणाला शंका नाही.
स्टॅलिन पुढे म्हणाले, की काही तक्रारांच्या आधारे किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार बालाजी यांची चौकशी केली असती तर त्यात काही चुकीचे नव्हते, मात्र, ते कुणी सामान्य व्यक्ती नाहीत, जे फरार होऊ शकतात. ते पाच वेळा आमदार राहिले असून दुसऱ्यांदा तमिळनाडूचे मंत्री बनले आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते.
अशा व्यक्तीला दहशतवाद्याप्रमाणे बंदिस्त करून चौकशी करण्याची गरजच काय? ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तपासासाठी पूर्ण सहकार्य केले होते. त्याचप्रमाणे, या अधिकाऱ्यांना हवे असलेले स्पष्टीकरण देण्याचीही त्यांची तयारी होती.
तरीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे १८ तास त्यांना बंदिस्त ठेवत कुणालाही भेटण्याची परवानगी दिली नाही. त्यांची प्रकृती बिघडल्यावरच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते तर त्यांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण झाला असता.
मुळात अशा आणीबाणीच्या चौकशीची गरजच काय, देशात अघोषित आणीबाणी लागू केली आहे का, ईडीच्या कारवायांवरून तर असेच वाटत आहे. भाजप नेतृत्वाला ईडीच्या माध्यमातून राजकारण करायचे आहे. त्यांना लोकांसाठी राजकारण करायचे नाही. त्यामुळेच, लोक भाजपवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. भाजपचे राजकारण लोकांच्या विरोधात आहे.
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मंत्रिमंडळात वाहतूक मंत्री असताना नोकऱ्यांसाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून ईडीने बालाजी यांना अटक केली.
- ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी
यांच्याशी संबंधित सुमारे १० वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून काढत मंत्री बालाजी यांना अटक करण्यात आली तसेच त्यांच्यावर मानसिक दबाव आणला गेला. ईडीमुळेच ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर झाले त्याचप्रमाणे त्यांना जीवाला धोका असणारा हृदयविकारही जडला. यापेक्षा निर्ल्लज्जपणे राजकीय सूड उगविला जाऊ शकतो का?
- एम.के.स्टॅलिन, मुख्यमंत्री, तमिळनाडू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.