चिपळूण (रत्नागिरी) : चाकरमान्यांना कोकणात येण्याची परवानगी मिळाली नाही तर चाकरमानी झुंडीने कोकणात येतील. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे योग्यवेळी हा निर्णय घ्यावा. चाकरमान्यांसाठी एसटी आणि रेल्वेची व्यवस्था करावी. अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा- कौमुदीने या कारणासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार करताच घेतली दखल अन्.... -
आमदार जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. या उत्सवासाठी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-पुणे आणि बाहेरगावी असलेला प्रत्येक माणूस हा गावी आपल्या घरी पोहोचतो. कोकणात घरोघरी गणपतीची मूर्ती आणली जाते. मुंबई-पुण्यामध्ये असलेला चाकरमानी गावी आल्याशिवाय हे सण साजरेच होत नाहीत. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या चार महिन्यांपासून मोठया संख्येने कोकणवासिय मुंबई-पुण्यामध्ये अडकून आहेत. या काळात कोकणात येण्यासाठी त्यांना प्रवासासाठी पासदेखील उपलब्ध होवू शकले नाहीत. जे आले त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आता किमान गणपती उत्सवासाठी तरी आम्हाला सुखरूप गावी जाता यावे आणि त्यासाठी सरकारने व्यवस्था करावी.
गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. परंतु, शासनाकडून स्पष्ट निर्णय होत नसल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे व राज्याच्या अन्य भागातील कोकणवासियांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. हा निर्णय वेळीच झाला नाही तर कोकणवासियांचा संयम तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर कोकणवायिय झुंडीने कोकणात यायला निघतील. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढण्याचीही भीती आहे.तरी, ही बाब लक्षात घेवून आपण कोकणवासियांसाठी रेल्वेच्या विशेष गाडया तसेच एस.टी बसेस ताबडतोब सुरू करून दिलासा दयावा. अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.