डोंबिवली - डोंबिवलीतील देशमुख होम्स संकुलातील रहिवासी गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन देखील पाणी येत नाही. केडीएमसी प्रशासन व एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवित आपली जबाबदारी ढकलत आहे. देशमुख होम्सचे पाणी अनंतम, रिजन्सी या बड्या गृहसंकुलांना बूस्टर पंप लावून वळविण्यात आले असून आम्ही मात्र पाण्यापासून आजही वंचित आहोत. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विनंती करण्यात आली आहे. अद्याप त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर येथी स्थानिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी पाणी प्रश्नावर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासन आता यावर काय उपाययोजना करते ते पहावे लागेल.
डोंबिवली पूर्वेतील टाटा पावर परिसरात देशमुख होम्स संकुल आहे. या संकुलात 1350 सदनिका धारक राहतात. 27 गावांसह या भागात देखील गेल्या कित्येक महिन्यापासून पाणी समस्या ही जटील आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने वेळोवेळी पाण्यासाठी आम्हाला विविध उपाययोजना करण्याची स्कीम दिली. त्यानुसार 2016 पासून स्व खर्चाने पाणी लाईन घेणेपासून ते टॅपिंग व्यास वाढविणे, झोनिंग करणेपर्यंत लाखो रुपये खर्चून स्वखर्चाने आम्ही योजना केल्या. उपाय योजना केल्यानंतर सुरुवातीला 8 ते 10 दिवस 800 ते 900 युनिट पर्यंत पाणी दाखवून नंतर ते पुन्हा 200 ते 300 युनिटवर आणले जाते. याविषयी लोकप्रतिनिधीं, एमआयडीसी, पालिका अधिकाऱी साऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र प्रश्न सुटला नाही. कल्याण डोंबिवली महापालिका म्हणते येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 150 मी.मी. व्यासाची नळजोडणीदिली आहे. संकुलातील अंतर्गत वितरण वाहिनीमध्ये सुधारणे करणे व अंतर्गत झोनिंग करणेसाठी आमदार राजू पाटील यांनी आमदार निधी दिला आहे. त्यानुसार प्राकलन तयार करण्यात आले आहे. संकुलातील इमारतींनी संकुलाच्या वितरण वाहिनीवर बुस्टरपंप जोडलेले असून ते काढण्यासाठी संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच एमआयडीसीने पिंगारा हॉटेल येथे वितरण वाहिनीला बसविलेला बुस्टर पंप काढण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा सुरु आहे.
रिजन्सी अनंतर येथील संकुलाच्या संप मधून उच्चदाबाने निर्धारीत वेळेत दावडी व गोळवली येथील पाणी पुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे असे सांगत आहे. तर एमआयडीसी या भागात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सर्वस्वी कल्याण डोंबिवली महापालिकेची असून एमआयडीसीने कोणतीही पाणी कपात केलेली नाही, उलट पाणी पुरवठ्यात वाढ केले असल्याचे सांगितले आहे. यामुळे नक्की जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण होऊन येथील समस्या जैसे थे आहे.
पाणी प्रश्नावरुन स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालिका प्रशासन, एमआयडीसी अधिकारी सर्वांची भेट घेतली. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील याप्रश्नी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतू कोणताही मार्ग न निघाल्याने येथील जागरुक नागरिक वंदना सोनावणे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासन आता यावर काय तोडगा काढते पहावे लागेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.