कल्याण : राज्य परिवहन महामंडळ आगार परिसराच्या २०० मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करू नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हा नियम धाब्यावर बसवून कल्याण एसटी आगारापासून २०० मीटरच्या आत प्रवासी चोरून अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित वाहनचालकांवर आगार प्रशासनाने वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एसटी आगाराच्या २०० मीटरच्या आत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी व्यवसाय करू नये, असे आदेश राज्य सरकारने काढले असून हे आदेश धाब्यावर बसवून कल्याण एसटी आगारापासून हाकेच्या अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू आहे. कल्याणच्या एसटी डेपोबाहेरच रेल्वे स्थानक ते गुरुदेव हॉटेल या मार्गावर कल्याण आळेफाटा, नगर, मुरबाड, पडघ्याकडे जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. हे वाहनचालक एसटी आगारात शिरून प्रवासीही घेऊन जातात. प्रवाशांना अक्षरशः कोंबून बसविले जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाचाही प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे.
या प्रकाराकडे वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे स्थानकाजवळ एसटी आगार असल्याने रेल्वेमधून आलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी रिक्षा चालकांची झुंबड उडालेली असते. कल्याण एसटी डेपोमधून पडघा, भिवंडी, श्रीमलंग, आळेफाटा, नगर, पुणे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना आवाज देत चक्क प्रवासी पळवून नेले जातात. त्यामुळे त्याचा फटका एसटीला सहन करावा लागत आहे.
संरक्षक भिंत बांधणार ...
कल्याण एसटी आगाराची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी पडल्या असून त्यातून चोरवाटीने वाहन चालक येऊन चक्क प्रवासी पळवून नेतात. याबाबत कल्याण आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच या भिंती बांधण्याचे काम सुरू करणार असून अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात एसटी महामंडळाकडून वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयाला पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.