सुनील पाटकर, महाड
ग्राहक राजाचे हित जपण्याचा प्रयत्न व्यापारी वर्गाकडून नेहमीच होत असतो. सध्या महाडमध्ये तीव्र उन्हाळा जाणवत असून याचा परिणाम शहरातील व्यापारी उलाढालीवर होत आहे. त्यामुळे महाडमधील व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनोखी युक्ती लढवली आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकाला सावली मिळावी, याकरिता थेट बाजारपेठेतील रस्त्यालगत मंडपाप्रमाणे आच्छादने उभारली आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त होत आहे.
काही दिवस महाडमधील उन्हाचा पारा चाळीस पार गेला आहे. यामुळे दुपारच्या वेळेत अनेकजण घराबाहेर पडण्याचे टाळतात. ग्राहकांची संख्या रोडावल्याने बाजारपेठेतील उलाढालीवरही परिणाम होत आहे. शिवाय उन्हामुळे व्यापाऱ्यांच्या मालही खराब होण्याची शक्यता असते. नारळ, भाजीपाला, फुले यांचेही नुकसान होत आहे, शिवाय उन्हामुळे ग्राहकही बाजारपेठेत फिरकत नाही.
ग्राहकांची गैरसोय दूर व्हावी, त्यांना खरेदी करताना सावली मिळावी, यासाठी व्यापारी वर्गाने ग्राहकाला राजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी मार्गावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील दोन्ही बाजूला उंचावर हिरव्या रंगांच्या कापडाचे आच्छादन केले आहे. याशिवाय भाजी मंडईचा परिसर, छत्रपती शिवाजी चौक परिसरात हिरवे नेट लावले आहे.
लग्नसराईच्या खरेदीसाठी गर्दी
आच्छादनामुळे ग्राहकाला सावली मिळू लागल्याने लग्नसराईच्या बस्त्यासाठी नागरिक दुपारी येऊ लागले आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळीही बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. बाजारपेठेत काही दुकानदार वर्गणी काढून हे आच्छादने दुकानावर बांधत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही आच्छादने काढली जातात. महाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे अनुकरण आता जिल्ह्यातील इतर ठिकाणीही होताना दिसत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.