कासा/वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात उन्हाळी भातशेतीचे पीक भरून आल्याने अनेक भागांत शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे. धामणी धरण आणि सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांमधून मिळणाऱ्या पाण्यावर भातशेती आणि भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. यंदा काही ठिकाणी कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणी उशिरा मिळाले, तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी भातलावणी केली होती.
रानशेत, सारणी, उर्से, साखरे, गोवणे, तवा, धामटणे पेठ, नानिवली आदी भागांतील शेतांमध्ये भातपीक जोमात आले असून कापणी सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळी भातपीक अधिक चांगले येत असल्याने, शेतकरी या हंगामात शेतीकडे अधिक झुकलेले दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्याचे भातपिकाचे उत्पन्न ५० ते ६० टक्क्यांनी घटण्याची भीती आहे. त्यामुळे लावणीचा खर्चही निघण्याची चिंता आहे. ज्या भागात पाट, पाण्याची सुविधा आहे, अशा भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी भातशेतीची लागवड केली आहे. खोडकिड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाने तयार केलेला वैभव विळ्याचा वापर करून भाताची कापणी करावी, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
खरिपानंतर उन्हाळ्यातही फटका
सातत्याने हवामान बदल, पावसाचे अनिश्चित स्वरूपामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यंदा खरीप हंगामात ऐन कापणीच्या वेळेस पावसाने झोडपून काढल्याने उभे भातपीक आडवे, तर कापलेले भातपीक शेतातच कुजल्याने नुकसान झाले होते. त्यानंतर आता उन्हाळी भातपीक कापणीला आले असतानाच अवकाळी आल्याने नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
खरीपानंतर उन्हाळी भातशेतीचे नुकसान झाले आहे. सद्य:स्थितीत भातशेती कापणी करण्याची तयारी सुरू आहे. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खरीप हंगामापेक्षा उन्हाळी भातलावणी फायदेशीर आहे.
- संजय पाटील, शेतकरी, उर्से, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.