पंढरपूरः महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेऊन काळाबाजार केला जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून, हा एकप्रकारे महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा अपमान आहे. पैसे घेऊन श्री विठ्ठलाचे झटपट दर्शन घडवणाऱ्या टोळीत कोण-कोण सामील आहेत याची सर्वोच्च स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अन्यथा येत्या अधिवेशनात या संदर्भात आपण आवाज उठवू, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने पृथ्वीराज चव्हाण येथे आलेले असताना पत्रकारांशी बोलत होते. श्री. चव्हाण यांचे कराड मधील राजकीय विरोधक असलेले भारतीय जनता पक्षाचे डॉ. अतुल भोसले हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीवरील एका शिवसेना नियुक्त सदस्यावर दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेतल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल झाला आहे. त्याकडे श्री. चव्हाण यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठीच्या पासची विक्री करुन काळाबाजार करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. हा काळाबाजार समितीच्या प्रमुखांच्या मान्यतेने चालू आहे का, न कळत चालू आहे याची सरकारने सर्वोच्च पातळीवर चौकशी केली पाहिजे. वारकऱ्यांनी देखील या विरोधात लढा दिला पाहिजे. पास विक्री प्रकरणात सध्या एक सदस्य सापडला आहे. त्याला निलंबित केले का असा प्रश्न करुन श्री. चव्हाण म्हणाले, समितीच्या अध्यक्षांची या संदर्भात जबाबदारी आहे. दर्शन पास विक्रीचा भ्रष्टाचार जी टोळी करत आहे. त्यामध्ये कोणकोण सामील आहेत. वाटणी कोणाकोणाला मिळत आहे याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. चौकशी करुन शासनाने समितीमध्ये बदल केले नाहीत तर येत्या अधिवेशनात हा प्रश्न आपण लावून धरु.
'दर्शन पास विक्रीतून कोणी किती पैसे मिळवले असा हा प्रश्न नाही तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. विठ्ठलाच्या नावावर काळाबाजार करणे हा वारकऱ्यांचा अपमान आहे,' असेही श्री. चव्हाण म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.