राजेगाव, ता. १३ : नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि जमिनीला ओलावा असल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडला आहे. यामुळे पिकांचे नियोजन कोलमडले असून, शेतकरी चिंतेत आहेत.
सततच्या पावसामुळे शेतात सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात वाफसा येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. साहजिकच वाफसा न आल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगामातील मका, तूर, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस इत्यादी पिके घेतल्यानंतर लगेच रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो. या हंगामातील महत्त्वाची असणारी गहू, हरभरा, भुईमूग, मका इत्यादी पिके घेतली जातात. परतीचा पाऊस लांबल्याने व शेतात वाफसा नसल्याने सध्या रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
दीपावलीच्या आधी शेतीची सर्व कामे आटोपून सणाचा आनंद लुटायचा असा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने शेतकरी खोळंबला होता. पाऊस माघारी फिरताच शेतातील कामांनी वेग घेतला होता. मात्र दिवाळी सणासाठी मजूर मिळत नसल्याने रखडलेली कामे आता पुन्हा सुरु झाल्या आहेत. या रब्बी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाला लागवड करतात.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने व मुसळधार पाऊस अखेरपर्यंत कोसळल्याने निचरा क्षेत्रातही ओलावा अधिक आहे. यामुळे रब्बी हंगाम रखडला असून याचा परिणाम पिकांवर होणार आहे. पावसामुळे शेती संकटात सापडली असून किमान रब्बी हंगामातील पिके बहरून यावीत अशी आशा आहे.
- अरविंद मोरे, शेतकरी, राजेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.