नाशिक : जलयुक्त शिवार, स्वच्छता, आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देऊन सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सामुदायिक प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आज येथे केले. 'सकाळ माध्यम समूह' आणि नाशिक जिल्हा परिषद यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्य आणि 15 पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांच्यासाठी ग्रामविकास कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल उदय सांगळे, उपाध्यक्षा नयना रमेश गावीत, सभापती यतिंद्र पाटील, अर्पणा खोसकर, सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, 'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते. चौदाव्या वित्त आयोगातून 4 वर्षात ग्रामपंचायतींना थेट 15 हजार कोटी रूपये दिले जाणार आहेत. त्यापैकी 2 हजार 930 कोटी राज्याला मिळणार आहेत. या निधीतून दर्जेदार कामे व्हावीत, यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष द्यावे, असही श्री.भुसे यांनी सांगितले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी कामकाज पद्धतीविषयी संवाद साधला. पुण्याच्या 'यशदा'मधील संशोधक प्रज्ञा दासरवार यांनी 'सुक्ष्म नियोजन' या विषयावर, पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यांनी 'बिझनेस ऑफ झेड.पी.' या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय जीवन्नोती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी राष्ट्रीय जीवन्नोती अभियानाची माहिती दिली. समाजकल्याणचे मुंबईचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे यांनी समाजकल्याण योजना सांगितल्या. आदिवासी विकास आयुक्तालयाचे सल्लागार अरूण सोनार यांनी वनहक्क व पेसा कायद्याची माहिती दिली. |