नाशिक : महाचक्रीवादळामुळे गुरुवार (ता. ७)पर्यंत मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने मासळीची आवक घटली असून, विविध माशांचे दर दुपटीने महागले आहेत. बाजारातील मासळीची आवक जवळपास ८० टक्क्यांनी घटल्याने विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
महा चक्रीवादळामुळे मासळीचे दर दुप्पट
वादळाच्या सावटाने हवामान खात्याने सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारपर्यंत मच्छीमारांना मच्छीमारी टाळण्याचे आवाहन केले आहे. दैनंदिन २०० ते ३०० बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी जात होत्या, त्या ठिकाणी सध्या केवळ १० ते १५ बोटी मच्छीमारीसाठी जात आहेत. खोलवर जाता येत नसल्याने बाजारातील मासळीचा साठा संपत चालला आहे. परिणामी किलोमागे सुमारे ३०० रुपयांची वाढ झाल्याने खवय्यांना इच्छेला मुरड घालावी लागत आहे. ४०० ते ५०० रुपये किलोने विक्री होणारा वाम ८०० रुपयांना मिळत आहे. गुजरात व मुंबई दोन्ही ठिकाणांहून ही मासळी येते.
गोड पाण्याच्या माशांवर भिस्त, चारशे रुपयांचा वाम आता पापलेटलाही भारी
महा चक्रीवादळाच्या भीतीने अवघी २० टक्के मासेमारी होत आहे. मागणी जास्त असल्याने शहरापर्यंत मासे विक्रीत घट झाली आहे. शहरातील बहुतांश मासळीविक्रेते धरण व नदीमधील मासळीवर अवलंबून आहेत. परंतु गोड्या माशांचीही आता जादा दराने विक्रेत्यांना खरेदी करावी लागत आहे.
माशांचा प्रकार | पूर्वी | सध्या |
वाम | 400 ते 500 | 800 |
पापलेट | 400 | 700 |
सुरमई | 400 | 700 |
कोळपी | 150 | 400 |
शिंगाडा | 120 | 200 |
बांगडा | 100 | 250 |
हलवा | 200 | 500 |
प्रतिक्रिया
मासेमारीवर वादळाचे संकट असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शुक्रवारपासून परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. सध्या तरी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. - नंदकिशोर काशिद, विक्रेता
ज्या ठिकाणी 200 ते 300 बोटी मासेमारी करत त्या ठिकाणी सध्या 10 ते 15 बोटी मासेमारीस जात आहेत. त्यामुळे माशांची आवक कमी झाली आहे. - कुसुम तारू, विक्रेत्या
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.