नियंत्रणमुक्त, कार्यक्षम अर्थव्यवस्थेला चालना...

देशाच्या आर्थिक विकासाची पद्धत आणि दिशा १९९१मधील सुधारणांमुळे बदलली. अर्थव्यवस्था आणि आर्थिक क्षेत्र दोन्हीही आधीपेक्षा मजबूत आणि लवचिक झाले.
B Sambamurthy
B SambamurthySakal

बाजारावर आधारित अर्थव्यवस्थेचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. परंतु, रॉबर्ट शिलर यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. ‘मुक्त व्यवस्थेचे चांगले परिणाम मिळत असले, तरी ही व्यवस्था क्लृप्त्या आणि सापळ्यांनी भरलेली असते. ज्ञान, सुधारणा आणि नियमनाद्वारे ही फसवणूक कमी केली जाऊ शकते,’ हे लक्षात घेतले पाहिजे.

देशाच्या आर्थिक विकासाची पद्धत आणि दिशा १९९१मधील सुधारणांमुळे बदलली. अर्थव्यवस्था आणि आर्थिक क्षेत्र दोन्हीही आधीपेक्षा मजबूत आणि लवचिक झाले. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील उदारीकरणामुळे नियंत्रणमुक्त, कार्यक्षम व परिणामकारक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.अनेक दशकांनंतर दहा खासगी बँकांना परवाने देण्याचे पाऊल सर्वांत महत्त्वाचे होते. आता नुकतेच छोट्या वित्तीय बँका आणि पेमेंट बँकांना परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये स्पर्धा वाढली, तसेच नावीन्यपूर्ण व कार्यक्षम उत्पादने बाजारात येण्याला चालना मिळाली. त्याचा फायदा ग्राहकांना झाला.

आर्थिक सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्रातील दडपशाहीचा जवळ जवळ शेवट झाला. बँकांकडील जवळ जवळ दोनतृतीयांश ठेवी (सीआरर २५ टक्के व एसएलआर ३८ टक्के) आपल्या ताब्यात ठेवण्याची पद्धत बदलली. सध्या सीआरआर ४ टक्के आणि एसएलआर २२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत विशेषतः खासगी बँकांना जास्त साधनसंपत्ती उपलब्ध झाली. व्याजदर नियंत्रणमुक्त केल्याने स्पर्धात्मक दरांमुळे आणि सेवा क्षेत्राची व्याप्ती वाढल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. शाखा परवाना धोरणाचे उदारीकरण आणि शाखारहित बँकिंगमुळे आवाका आणि लोकांसाठीची उपलब्धता वाढली.

बाजाराने निर्धारित केलेले विनिमय दर, चालू खात्यावरील परिवर्तनीयता, भांडवली खात्याचे उदारीकरण, जाचक ‘फेरा’ची जागा सुलभ अशा ‘फेमा’ने घेणे, परकीय चलनाच्या बाबतीत काही नियंत्रणमुक्तीचे उपाय योजले, त्यामुळे जगाच्या बरोबरीने येण्यास भारताला मदत झाली. या सुधारणांनी आर्थिक सेवांच्या लोकशाहीकरणाला आणि सुलभतेला हातभार लावला. वारंवार निर्माण होणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावरील थकीत कर्जांचा (एनपीए) विपरीत परिणाम सुधारणा कार्यक्रमावर होत आहे. सुधारणा प्रक्रियेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अपरिवर्तनीयता. सुधारणा प्रक्रिया हा एक प्रवास आहे आणि ते उद्दिष्ट नाही आणि हा प्रवास मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हितासाठी आनंदाने सुरू आहे. या आर्थिक सुधारणांना व्यापक प्रमाणावर राजकीय सहकार्य आहे.

बाजारावर आधारित अर्थव्यवस्थेचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. परंतु, मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट शिलर यांनी अशा व्यवस्थेबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. ‘मुक्त बाजारव्यवस्थेचे चांगले परिणाम मिळत असले, तरी ही व्यवस्था क्लृप्त्या आणि सापळ्यांनी भरलेली असते आणि आपल्याला मूर्ख बनवून आपल्याकडून माहिती काढून घेत असते. ही आर्थिक फसवणूक अधिक ज्ञान, सुधारणा आणि नियमनाद्वारे कमी केली जाऊ शकते’’ (पुस्तक : फिशिंग फॉर फूल्स). पुढील वाटचाल कशी असेल, याचे चित्र यातून स्पष्ट होते.

- बी. सांबमूर्ती, माजी अध्यक्ष आयडीआरबीटी व मुख्य व्यवस्थापकीय संचालक कॉर्पोरेशन बॅंक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com