लढा दुष्काळाशी : छावण्यामुळे जगली जनावरं (ब्लॉग: भाग- 3)

लढा दुष्काळाशी : छावण्यामुळे जगली जनावरं (ब्लॉग: भाग- 3)

दुष्काळ येताना कधीच एकटा येत नाही. त्याच्याबरोबर अनेक परिणामकारी गोष्टी येत असतात. गेल्या वर्षी पाऊस न पडल्यानं गावचं रंगरूप हळूहळू पालटलं. हिरवं शेत ओसाड पडत गेलं. पाणी आटलं, डोगर उघडे पडत गेले, गावात हळूहळू दुष्काळानं डोकं वर काढलं. त्यामुळे स्वत:चं आस्तित्व टिकवण्यापासून लेकरासारखं वाढवलेल्या जनावरांनाही जगण्याचा संघर्ष सुरू झाला. दुष्काळात जनावरं जगविण्यासाठी सरकारने थोड्या उशीरानेच चारा छावण्या सुरू केल्या. राज्यात बाराशेच्यावर छावण्या सुरू झाल्या आहेत. या छावण्याच्या माध्यमातून लाखो जनावर जगविले जात आहेत.

आमच्या गावात (चिंचपूर पांगुळ) दोन चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. पंचक्रोशीत अशा पाच छावण्या सुरु झाल्या आहेत. आमचं गाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सिमारेषेवर असल्याने आमच्या गावची आणि पंचक्रोशीची नेहमीच पंचाईत होत असते. त्याच होतं असं की आम्ही येतो पश्चिम महाराष्ट्रात मात्र, भौगोलिक परिस्थिती ही मराठवाड्याची असते. त्यामुळं दुष्काळ मराठवाड्यात जाहीर होतो. विमा मराठवाड्याला मिळतो. गाव पश्चिम महाराष्ट्रात असल्याने गावात दुष्काळ असूनही जाहीर होत नाही. यावर्षी मात्र, गावात दोन चारा छावण्या सुरु झाल्या. 

गावातल्या दोनही छावण्यात दोन हजाराच्या आसपास जनावरांची संख्या. गेल्या तीन चार दिवसापासून गावोगावच्या छावण्या पाहत आहे. मात्र, गावचे सरपंच धनंजय बडे यांनी सहकाऱ्यासह सुरु केलेली छावणी सर्वाधिक हायटेक आहे. चोख नियोजन असून छावणीत लाईटपासून सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. आग प्रतिबंधक साहित्यही छावणीत आणून ठेवलंय. साऊंड- माईकच्या माध्यमातून चारा-पाण्याची माहिती दिली जाते. एकूणच काय तर, ही छावणी डिजीटल आहे. छावणीसाठी चारा पुणे जिल्ह्यातून आणावा लागतोय. प्रती जनावर पंधरा किलो चारा प्रतिदिन दिला जातो. (सरकारने दोन दिवसापुर्वी पंधरा किलोवरुन अठरा किलो केलाय) चाऱ्याबरोबर पेंड दिली जाते. छावणी बेलपारा मध्य प्रकल्पाच्या (तलाव) बाधित जमिनीवर आहे मात्र, तलावात पाण्याचा थेंबही राहिलेला नाही. छावणीला टँकरने पाणीपुरठा केला जातो. छावणीतील जनावरांचे लसीकरण करण्यात येतयं, हे सगळं छावणीतील एकजण सांगत होता.

गावात सुरू झालेल्या या दोन्ही चारा छावण्याने गावातली जनावरं जगलीत आणि विक्री होण्यापासून वाचलीतही. चार-पाच दिवसापासून 20 ते 25 चारा छावण्या पाहण्यात आल्यात प्रत्येक छावणीत हजारो जनावरं आहेत. सरकारने जर या छावण्या सुरू केल्या नसत्या तर, शेतकरी ढासळला असता, हजारो जनावरांचा मृत्यू झाला असता. गावातील बेलपारा मध्यम प्रकल्प हे धरण दोन महिन्यापासून कोरडा ठण पडलेला आहे.

क्रमश...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com