'यांच्या'मुळेच घडली ही रत्ने

Sharad_Pawar)
Sharad_Pawar)

आजच्या युगातील शाहू- फुले- आंबेडकर यांच्या कार्याचे व विचारांचे खरे वारसदार कोण असतील तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आदरणीय शरद पवार यांचेच नाव येईल. ज्याप्रमाणे शाहू- फुले- आंबेडकर यांनी समाजातील अंधश्रद्धा, विषमता, जातीयता, चुकीच्या रूढी- परंपरा, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध करून समाजाला संघटित केलं. शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन समाजाला शिक्षण मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, रयत शिक्षण संस्था यांसारख्या वेगवेगळ्या संस्था उभारून बहुजन समाजाला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. शाहू- फुले- आंबेडकर यांनी त्या काळच्या सवर्ण व दलित यांच्यात असणारी विषमता कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे श्री. पवार यांनीसुद्धा जुन्या संस्था स्वतःच्या नियंत्रणात ठेवून व बहुजन समाजाच्या शिक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन विद्या प्रतिष्ठानसारख्या अनेक संस्था उभ्या केल्या. श्री. पवार हे कधीच विसरले नाहीत, की या संस्थांमध्ये समाजातील आर्थिक मागास घटक, दलित व बहुजन वर्ग शिक्षण घेतो. म्हणून त्यांनी कधीच या संस्थांची व वसतिगृहांची वार्षिक प्रवेश फी सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाऊ दिली नाही. आज जर आपण पुण्यातीलच श्री. पवार यांच्या नियंत्रणातील शाहू कॉलेज, वाय. सी. लॉ कॉलेज, जेधे कॉलेज, एसएसपीएमएस, या ठिकाणच्या सुविधा व फीविरुद्ध इतरांच्या नियंत्रणातील संस्थांमधील सुविधा व फीचा विचार केला तर खूपच फरक जाणवेल. म्हणूनच श्री. पवार यांना समाज शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा वारसदार उगीच म्हणत नाहीत!
श्री. पवार यांच्या संस्था नसत्या तर, कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळासारख्या तालुक्‍यातील खेड्यांमधून नीलेश गायकवाड, चेतक गणगे, नीलेश खाटमोडे, हिंमतराव शिंदे, कुलगुरू अरुण अडसूळ, भैय्या अडसूळ, तुकाराम सातव अशी अनेक रत्ने घडलीच नसती. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे माझ्यासह अनेकजण त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक सुविधांचे लाभार्थी ठरले आहोत. ही नावं फक्त उदाहरण म्हणून आहेत. अशा अनेक व्यक्ती घडल्या त्या केवळ श्री पवार यांच्यामुळेच हे मी ठामपणे सांगतो आहे. 
ज्याप्रमाणे शाहू-फुले-आंबेडकर यांनी समाजकंटकांना न घाबरता कार्याचा व विचारांचा जो रेटा लावून धरला, त्याप्रमाणे श्री. पवार यांनीसुद्धा स्वत:चे हे कार्य निर्भयतेने पुढं रेटले आहे. 
जास्तीत जास्त बहुजन समाज हा शेतमजूर व शेतकरी आहे. श्री. पवार यांनी शेतकऱ्यांची गरज ओळखून साखर कारखाने, दुग्ध व्यवसायावर प्रक्रिया करणारे उद्योग किंवा शेतमालावर प्रकिया करणारे उद्योग स्थापन करणाऱ्याला प्रोत्साहन दिले व स्थापन केल्या. यातून अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य मोबदला तर मिळालाच त्याबरोबर बहुजन वर्गातील मध्यम शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. याही ठिकाणी गैरव्यवहाराचे आरोप करून त्यांना मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सहकारातील गैरव्यवहाराचा आणि श्री. पवार यांचा काही संबंध लागूच शकत नाही. ज्या ठिकाणी असे आरोप केले जातात त्या ठिकाणचे चेअरमन किंवा संस्थाचालक हे श्री. पवार यांच्या पक्षातील असल्याने त्यांचे आरोप श्री. पवार यांच्यावर केले जातात. श्री. पवार यांनी उच्चशिक्षित तरुणांचे रोजगाराचे प्रश्‍न लक्षात घेऊन आयटी हब, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री यांसारखे प्रकल्प उभे केले. 
महिलांना शिक्षणात, रोजगारात आरक्षण देऊन स्त्री- पुरुष समानता साधण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देऊन शैक्षणिक, आर्थिक, विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. अशा शरद पवार यांना जन्मदिनाच्या दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. 
- लहू काळे, सीए, करमाळा. 9762448282

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com