कोरोनामुक्तीचा करूया निर्धार! 

कोरोनामुक्तीचा करूया निर्धार! 

पिंपरी-चिंचवड : कोरोना आला आणि गेला असा भलताच समज नागरिकांचा झाला आहे. यातूनच दररोजच्या रुग्णवाढीचा वेग सुसाट झाला आहे. आलेखाचा बाण अधिक टोकदार आणि एकूण रुग्णसंख्येच्या टेकडीचा डोंगर बनला आहे. तरीही लोकांना शहाणपण कसे येत नाही, याचेच आश्चर्य वाटते. मास्क लावा, सॅनिटायझर लावा, शारिरिक अंतर राखा, गर्दी टाळा एवढीच दक्षता आपण घ्यायची आहेत. आणि कोरोनाची लक्षणे वाटताच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन होऊन औषधोपचार घ्या, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनांच्या आहेत. मात्र, लक्षात कोण घेतो? अशी सद्यःस्थिती आहे. 

सोसायट्यांच्या आवारापासून रस्ते ते बाजारपेठा गर्दीने भरून वाहताहेत. लोकांच्या खिशातील आणि दुकानांच्या दारातील सॅनिटायझर बाटल्या कधीच गायब झाल्या आहेत. मास्क नाकापासून घसरत घसरत हनुवटी ते गळ्यापर्यंत आला आहे. वाढदिवसाचे केक रस्तावर कापले जाताहेत, वराती निघताहेत. सर्वत्र धूमधडाका सुरू आहे. मात्र, कोण कोणाला बोलणार?
नागरिकांची स्मरणशक्ती अवघ्या वर्षभरात कमी कशी काय झाली, याचेच आश्चर्य वाटते. कोणालाच कशी काय कोरोना आणि त्याची भयानकता आठवेनाशी झालीय. लॉकडाउनला वर्ष होत असले तरी त्यापूर्वी काही महिने आधी इतर देशात किती रुग्ण याची माहिती टीव्हीवरून समजत होती. भारतात कोरोना आला तर काय? यावर चर्चा झडताझडता लॉकडाउनची घोषणा झाली. बेकरी, फरसाणपासून दारूच्या दुकानापर्यंत खरेदीसाठी गर्दीच गर्दी! सर्वजण सुटी एन्जॉय मूडमध्ये. मात्र, नव्याचे नऊ दिवस संपले. घरातला किराणा संपू लागला. सर्वसामान्य माणसांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या. कामधंदे बंद पडले. ‘वर्क फ्रॉम होम’वाल्यांच्या घरोघरी भांडणे सुरू झाली. घराबाहेर सगळे काही बंद. औद्योगिक कंपन्यांमधील २४ तास धडधडणारी यंत्रे बंद. रस्तावर चिटपाखरू नाही. त्यात घरेलू कामगार नसल्याने गृहिणींचा संताप. घराघरांत उद्निगता वाढली. ‘कोरोना राहू दे, पण आधी लॉकडाउन उठू दे’ असा धावा करण्याची वेळ सर्वांवर आली. दररोज कामावर गेले तर पोट भरेल अशा लोकांपासून पिढ्यानपिढ्या घरी बसून खाऊ शकतील, असे सर्वजण एका पातळीवर आले. 

रुग्णालयातील बेड संपले. साऱ्यांची दैना झाली. मग प्रत्येकातील माणुसकी जागी झाली. किराणापासून आरोग्य कीटपर्यंतचे वाटप, चोवीस तास अन्नछत्र उपक्रमांना प्रारंभ झाला. चेहरा लपवून रांगेत उभा राहणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. हळूहळू लॉकडाउन कमी होत गेले. लोकांच्या अंगात उत्साह संचारला. कामधंदे सुरू झाले. आता पुन्हा जिकडे तिकडे गर्दी. कोरोना आसपास नव्हे तर अंगाखांद्यावर आहे तरी कोण ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. कारण रोजीरोटीचा प्रश्न आहे. तो साऱ्यांनाच आहे, तरीही ‘मी नियम पाळेन’ असे प्रत्येकाने ठरवले तरी लॉकडाउन आणि कोविड सेंटरची वेळ येणार नाही. अजून आपण लॉकडाउनमध्येच आहोत. सर्वकाही खुले नाही. अनेक बंधने लागू आहेत. त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. म्हणजे दरवेळी पोलिसांनी काठ्या घेऊन मारायलाच हवे? की प्रत्येक नियमभंगाबद्दल दंड ठोठवायचा? बलदंड लोक काठ्या खातील, श्रीमंत लोक दंड भरतील. कदाचित नव्याने लॉकडाउन त्यांना परवडेल; पण ज्यांचे रोजगार, नोकऱ्या, धंदे कोरोनाने हिरावून गेले आहेत आणि टळटळत्या उन्हात त्यांची पायपीट सुरू आहे. चांगल्या पगाराचे लोक लोणची, पापड, भाजी विकताहेत. निदान त्यांच्यासाठी तरी आपण शिस्त, स्वच्छता आणि नियम नको का पाळायला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com