Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर व भारत

22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण व पवनपुत्र हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
ayodhya lord shri ram mandir and India significance
ayodhya lord shri ram mandir and India significance Sakal

Ayodhya Ram Mandir And India : येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण व पवनपुत्र हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यातील प्रत्येक बारकाव्याचे वृत्त क्षणोक्षणी देशाला सांगितले जात आहे.

शरयू नदीच्या काठी वसलेल्या अयोध्येत बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक विमानतळावर त्या दिवशी तब्बल 8 हजार आमंत्रित उतरणार असून, दर्शन घेण्यासाठी रेल्वे व अन्य वाहनांनी जाणाऱ्यांची संख्या लाखांनी असेल.

एका अंदाजानुसार, त्या नंतर अयोध्येला भेट देणाऱ्या भक्त-पर्यटंकाची दैंनदिन संख्या अंदाजे दीड ते दोन लाख असणार आहे. अवघ्या तीन महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने या उद्घाटनाची दाट छाया मतदारावर पडेल व ते भारतीय जनता पक्षाच्या यशासाठी महत्वाचे ठरेल, यात आता शंका उरलेली नाही.

देशात गेल्या दहा वर्षात झालेल्या सुधारणा व विकास याच्या जोडीला राम मंदिराची उभारणी भाजपसाठी कळीची ठरणार आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येऊ पाहाणाऱ्या विरोधकांच्या `इंडिया आघाडी’ला भाजपचा सामना करण्यासाठी अनेक पातळीवर लोकशाहीची झालेली पीछेहाट,

गळचेपी हे कारण पुरेसे ठरणार नाही, तर आघाडीतील एक्य शेवटपर्यंत टिकून राहाते की नाही, भाजपला एकास एक उमेदवार देण्यास ते यशस्वी होतात, की नाही, यावर बरेच काही अवलंबून असेल. मोदी विरूद्ध कोण असा सवाल मागे पडला असून,

आघाडीच्या गोटातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आले आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेही नाव अधुनमधून चर्चेत असते. मोदी यांच्यापुढे त्यांची व्यक्तिमत्वे फिकी आहेत.

परंतु, चंद्रशेखऱ, इंद्रकुमार गुजराल, पी.व्ही. नरसिंह राव, एच.डी. देवेगौडा या अचानकपणे झालेल्या माजी पंतप्रधानांकडे पाहाता, भारतात नेतृत्वाची तृटी एयन वेळी भरून काढता येते, हे ही सिद्ध झाले आहे.

काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात हिमाचल व कर्नाटक या राज्यात भाजपची पीछेहाट होऊन कांग्रेस पक्ष तेथे सत्तेवर आला. तथापि, नंतर झालेल्या राजस्तान व छत्तीसगढ मध्ये भाजपने काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली.

मध्य प्रदेशात पुन्हा भाजप आला. त्यामुळे, राहूल गांधी यांनी केलेल्या दक्षिणोत्तर पदयात्रेचा त्या निवडणुकात लाभ झालेला दिसत नाही. 14 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या त्यांच्या पूर्व ते पश्चिम राज्यांच्या `भारत जोडो न्याय’ यात्रेचा कांग्रेसला लाभ होणार का, झाला तर किती प्रमाणात तिचे प्रतिबिंब मतपेटीत पडेल याबाबत शंका आहे.

नाही म्हणावयास कांग्रेसला तेलंगणात मिळालेली सत्ता ही कन्सोलेशल प्राईज आहे. राम मंदिराच्या उभारणीने काउबेल्टमधील राज्ये भाजपला साथ देण्याची शक्यता अधिक. तथापि, दिल्ली, बिहार, पंजाब, हिमाचल व पश्चिम बंगाल या राज्यात व कर्नाटक, तामिळ नाडू, आंध्र, तेलंगणा, ओडिसा, केरळ आदी राज्यात भाजप किती शिरकाव करू शकेल, यावर यशापयश अवलंबून राहील.

22 जानेवारी पर्यत व त्या नंतर सारा देश राममय करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. विरोधकांच्या मते रामाचे नाव घेत भाजप मतांची जुळवाजुवळी करणार. रामायण व महाभारत ही भारताची महाकाव्ये. भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ. तथापि, निरनिराळ्या भाषा, 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश यातील वैविध्य पाहता, देवाधिकांचीही त्यात विभागणी झालेली दिसते.

महाराष्ट्रात मुंबईचा सिद्धिविनायक, पुण्याच्या पेठातील असंख्य गणपती व मारूतीची मंदिरे, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचे विठोबा रखुमाई, गुरूदत्ताची देवस्थाने,

तिरूपतीचा बालाजी, आसामची कामाख्या, पश्चिम बंगालची दुर्गा, उज्जैनचा महाकाल, भगवान शंकराची दक्षिण व उत्तर भारतात असलेली असंख्य मंदिरे, मथुरेतील कृष्णाची मंदिरे, (मथुरा वृंदावन) कार्तिकेय, मरियामन उर्फ पार्वती, मुरूगन यांची दक्षिणेत होणारी पूजा,

शबरीमला येथील अय्यप्पन (धर्मशास्त्रानुसार अय्यपन हा शंकर व मोहिनीचा पुत्र होय), ब्रह्मा, विष्णु व महेश यांची दत्तमूर्ती आदी देवाधिदेव यांचे कोट्यावधी भक्त आहेत. याशिवाय शिखांचे अमृतसरमधील हरमंदिर,

जैनांच्या एका पथांचा पालिथाणामधील महवीर व दुसऱ्या पंथाचा श्रवणगोळबेळा येथील गोमटेश्र्वर, दर्गा व मशिदींतून मुसलमानांचे चालू असलेले अल्ला हो अकबर, ज्यूंचा झरतृष्ट (सायनोगॉग), येशूंच्या भक्तासाठी असलेले केरळातील सेन्ट फ्रान्सिस,

गोव्यातील बॅसिलिका बॉम जीझस, तामिळनाडूतील वेलंकानी व पश्चिम बंगालमधील सेन्ट पॉल कॅथेड्रल व चर्चेस अशी विविध धर्मियात विभागणी झालेली दिसते. याचा अर्थ रामाव्यतिरिक्त अन्य देवदेवतांना तितकेच महत्व आहे. भारतातील अठरा पगड जाती, आदिवासी यांच्या देवदेवतांकडे पाहता त्यांच्या प्राणीदेवतेला असलेले महत्वही ध्यानी येते.

इश्वर एकच आहे, असे आपण भले म्हणोत, परंतु, प्रत्येकाचा एक देव असतो. जो तो आपापल्या परीने त्याचे पूजन करतो. अयोध्येत होणाऱ्या भव्य मंदिराकडे व तेथे होत असलेल्या विकासाकडे पाहता, त्याची तुलना स्पेनमधील बार्सेलोनामध्ये गेली शंभर वर्षापासून सुरू असलेल्या `सरगदा फॅमिलिया’ या जगातील सर्वात मोठ्या चर्चशी करावी लागेल.

इस्लामसाठी सौदी अरेबियातील मक्का व मदीना ही धर्मस्थळे आहेत. ज्यूंसाठी जेरूसलेम, (येहवे – द गॉड ऑफ अब्राहम, आयझॅक अँड जेकब- नॅशनल गॉ ऑफ इस्राएल) ख्रिश्चनांसाठी इटलीतील व्हॅटिकन सिटीतील जीझस व मेरी ही सर्वात महत्वाची धर्म व श्रद्धास्थाने मानली जातात.

तसेच, भारतात व जगात परसलेल्या सुमारे कोट्यावधी हिंदुंसाठी अयोध्येतील राम मंदिर हे श्रद्धास्थान ठरणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने मानावपनाचा अंकही रंगणार आहे. त्याचे आमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात येणार काय? हिंदु मठांच्या चार शंकरायार्यांना आमंत्रण का देण्यात आलेले नाही?

22 जानेवारी रोजी ते करण्याअयवजी रामजन्म झाला त्यी रामनवमीला (17 एप्रिल 2024) रोजी उद्घाटन का होऊ नये? शिवाय मंदिरांची बांधणी पूर्ण व्हावयाची असूनही ती पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटनाची घाई कशासाठी?

असे प्रश्नही विचारले जात आहेत. परंतु, एक गोष्ट मात्र निश्चित, की भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरू व्हावयाचे असेल, तर श्रद्धेबरोबर विज्ञानाची कास धरावी लागेल. भोळ्या समजुती आणि दंतकथांना खतपाणी घालणे देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक ठरेल. तसेच धर्म व राजकारण यांचे एकत्रिकण होऊ देणे धर्मनिरपेक्षतेला अनुसरून असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com