देश देव माझा... संतसाहित्यातही प्रजासत्ताक राज्यपद्धतीची तत्त्वे

देश देव माझा... संतसाहित्यातही प्रजासत्ताक राज्यपद्धतीची तत्त्वे

अगदी महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, 
"पवित्र ते कुळ पावन तो देश। 
जेथे हरीचे दास जन्म घेती।।' 
जगाच्या भल्याची वांच्छना करणारे कितीतरी महात्मे याच भूमीत जन्मले. त्या सगळ्यांच्या पायधुळीने स्पर्शीली गेलेली ही माती कविवर्य पंडित आवळीकर म्हणतात त्याप्रमाणे 
"ज्या मातीवर आज 
उभा मी ताठ ठेवूनि मान। 
असे तू हीमाचल ही माती 
जिचा मला अभिमान।।' 
वास्तविक प्रजासत्ताक राज्यपद्धतीच्या बळकटीसाठी आवश्‍यक असणारी कितीतरी तत्त्वे आम्हाला आमच्या संतसाहित्यात दिसतात. प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये मूलभूत असणारी व्यक्ती सन्मानाची कल्पना आमच्या तुकोबारायांनी, 
"कोण्याही जीवाचा 
न घडो मत्सर। 
वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।' 
या शब्दात मांडलेली आहे. स्त्री पुरुष समानतेच्या कल्पनेसाठी आवश्‍यक असणारे दृढ स्त्री मानसिकत्व उत्तेजित करण्यासाठी, "स्त्री जन्म म्हणूनि न व्हावे उदास।' असं सांगून संत आम्हाला, 
"या रे या रे लहान थोर। 
याती भलती नारी नर।।' 
या शब्दात जीवन विकासाच्या प्रक्रियेत आपण सगळेच जण समान आहोत हे सांगतात. 
मानव्याच्या अत्युच्च दर्जाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेला व्यक्ती सन्मान आपल्या साहित्यात प्रधान समजून साहित्य निर्मिती करणारे कितीतरी महात्मे या भूमीत जन्मले आहेत. यामध्ये 
"जे जे भेटे भूत। 
ते ते मानिजे भगवंत।।' 
असं सांगून प्रत्येत व्यक्ती ईश्वराचा अंश आहे हे सांगणारी माउलींची कल्पना असो. "जाग रे जाग, दादा मोठी गडद अंधारी।' असं सांगून साधकाला आत्मोन्नती साधण्याचा प्रयत्न करायला सिद्ध करणारी तुकोबारायांची वाणी असो, उच्चता आणि निचता या सगळ्या कल्पना विसरून सगळ्या समाजातील लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवणारे संत एकनाथ असोत. या आणि इतर आशा सर्वच संतांनी आम्हाला निर्दोष जगायला सांगितलं. हे निर्दोष जगणंच राष्ट्र आणि देश यांच्या विकासासाठी कारणीभूत ठरत असतं. 
"मार्ग दाऊनी गेले आधी।।' या न्यायाने व्यक्ती विकास आणि त्यातून राष्ट्रहित यासाठी ज्या त्या काळात जे ते महात्मे आपल्याला आपापल्या परीने आम्हाला सांगत गेले. आता वेळ आहे आपण तसं वागायची. खऱ्या अर्थाने आपण जेव्हा या सगळ्यांनी सांगितलेल्या वचनांप्रमाणे वागू तेव्हाच त्या काळात सांगितलेल्या त्या सगळ्या महात्म्यानच्या वचनांची फलद्रुपता सिद्ध होईल. 
तसं पाहिलं तर, 
"सोडिले सर्व घरदार। 
सोडीला सुखी संसार।।' 
या न्यायाने आपल्या संपूर्ण जीवनावर तुळशीपत्र ठेऊन खूप खडतरपणे स्वतःला स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात लोटून देणाऱ्या राष्ट्रवीरांचा विचार करता, आज आमच्याबद्दलची राष्ट्रनिष्ठेची कल्पना खूपचं सोपी झालेली आहे. आज आम्हाला जे जवळ आहे, त्यातील कशाचाच त्याग न करता निव्वळ किमानअंशी योगदान देशासाठी द्यायचं आहे; पण ते देखील आमच्याकडून होत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. 

आपल्या अस्तित्वाने इतरांच्या अस्तित्वाला अजिबात बाधा न येऊ देणं म्हणजे राष्ट्रहित असू शकतं आणि आम्हाला ते सहजगत्या साधता येऊ शकतं. त्यासाठी ना जीवन वेचावं लागतं, ना जीवित वेचावं लागतं, फक्त एकच करावं लागतं, की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात आपलं काम "लाखोंमे एक' असलं पाहिजे. आपापल्या क्षेत्रात प्रत्येक व्यक्ती अशी चमकत गेली तर देश सर्वच अंगाने विकसित व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आपण तो विकास 
"देश हा देव असे माझा। 
अशी घडावी माझ्या हातून मंगलमय पूजा।।' या न्यायाने करू या आणि विकसित बनूया.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com