रिश्‍ते नहीं छोडा करते...! 

corona virus argument on social media
corona virus argument on social media

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एका व्हॉट्‌सऍप ग्रुपवर "तबलिगी'वरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. कालांतराने एका समाजघटकावर थेट आरोप सुरू झाले. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती झाली; मात्र काही जाणत्या लोकांनी समजूतदारपणाची आठवण करून देत वातावरण शांत केले, तर काही लोकांनी आपण यात पडायला नको म्हणून सरळ ग्रुप सोडून टाकला. 

समाजमाध्यमांत अशा गोष्टी सुरू असतानाच इकडे अनेक गावांत बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याचे निर्णय होऊ लागले. यातून प्रवेशद्वारांवर कुंपणे घातली जाऊ लागली, काहींनी चरी खोदल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या सगळ्या गोष्टींना ऊत आला होता. या सर्व घडामोडी मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांपर्यंत जाऊन थडकल्या आणि गलबलून गेलेल्या चाकरमान्यांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या, "...मग आम्ही जायचं कुठं?' 

खरं तर वर उल्लेख केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरील लोक एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे. रोज एकमेकांचे चेहरे पाहिल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही. तरीही कठीण परिस्थितीत इथे विवेक ढळला. हेच काही गावकरी आणि चाकरमान्यांच्या बाबतीतही घडले. गावच्या कोणत्याही कार्यात गावकऱ्यांनी साद द्यावी आणि तितक्‍याच उत्स्फूर्तपणे चाकरमान्यांनी प्रतिसाद द्यावा, हे समीकरण वर्षानुवर्षे घट्ट आहे. उन्हाळी सुटी संपवून परत मुंबईकडे जाताना चाकरमान्यांची तगमग आणि गावकऱ्यांचे हुंदके अनुभवले की गाव आणि मुंबईचं नातं किती गहिरं आहे, याचा प्रत्यय येतो. आजही मुंबईहून येणारा माणूस मोकळ्या हातानं येत नाही आणि मोकळ्या हातानं त्याला परत पाठवलंही जात नाही. 

कोरोनाच्या काळात मात्र ही मनं कलुषित होतात की काय, अशी भीती होती; पण उशिरा का होईना, गावागावात विलगीकरण कक्षात चाकरमान्यांची घेतली जात असलेली काळजी पाहिली की, सकारात्मकता वाढीस लागते आणि ही भीती अनाठायी ठरत असल्याचा प्रत्यय येत राहतो. चाकरमानीसुद्धा आपली जबाबदारी समजून दक्षता समितीने शासनाच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या नियमांचे पालन करत आहेत. काही ठिकाणी विलगीकरण कक्ष असलेल्या शाळांचा परिसर चाकरमानी स्वच्छ-सुशोभित करत आहेत. यातून गाव आणि मुंबईचं नातं बहरत जाईल यात शंका नाही. 

कठीण काळात आपल्या विवेकाची खरी कसोटी असते. कोरोनाचं संकट मोठं आहे. या काळात आपलं संयम आणि समजूतदारपणाचं वर्तन आपल्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायला साह्यभूत ठरेल. समाजमाध्यम, व्हॉट्‌सऍप ग्रुपवरही आपण भाईचारा टिकवून ठेवायला हवा. कारण कोरोना जाईलही... आपल्याला मात्र एकमेकांसोबत राहायचं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com