जळगावला हवंय दमदार नेतृत्व

Jalgaon
Jalgaon

जळगाव शहर आणि जिल्हा सध्या दमदार नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वव्यापी नेतृत्व नसल्याने जळगावची सध्या घुसमट होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, ईश्‍वरलाल जैन ही जळगावची मोठी नावं सध्या चर्चेत नाहीत. राजकीय पटलावरही ही मंडळी आता दिसत नाहीत. त्यामुळे निर्णयक्षम नेतृत्वाच्या अभावाने शहराची आणि जिल्ह्याची मोठी पीछेहाट होत असल्याची विदारक स्थिती आहे.

नेतृत्वाच्या अभावामुळेच विकासाच्या मोठ्या कामांपासून जळगावचा संपूर्ण परिसर सध्या वंचित आहे. या फळीच्या आधीदेखील प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरी ही नावं राज्यात चर्चेत असायची. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यावर अजूनही हवी तशी पकड मिळवता आलेली नाही. गुलाबरावांचा मूळ आक्रमक स्वभाव सध्या कुठेतरी हरवलेला दिसतो. जळगाव महापालिकेत सत्ता असेपर्यंत गिरीश महाजन यांचा वरचष्मा जाणवत होता. महाजनांचं नेतृत्व दमदार असतं, तर महापालिकेत भाजपला खिंडार पडलं नसतं. महापालिका वाचवण्यासाठी महाजनांच्या नेतृत्वाची ताकद दिसून आली नाही. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना शहरातील रस्त्यांनी सध्या सतावलेलं आहे. भोळे यांची प्रतिमा सर्वसमावेशक वाटत नाही. शिवाय त्यांचा स्वभाव आक्रमक नसल्याने शहरातील विकासकामं मार्गी लागत नाहीत, असं चित्र निर्माण झालं आहे. शहरातील सध्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना सुरेशदादांच्या नेतृत्वाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रवादीत प्रवेश करून एकनाथ खडसे आक्रमकपणे जिल्ह्याला नेतृत्व देतील, अशी आशा होती. तथापि, केंद्र सरकारच्या मदतीने खडसे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्यातरी यशस्वी होताना दिसतोय. त्यामुळे खडसे सध्या बचावात्मक भूमिकेत आहेत. थोडक्यात २०२४ च्या लोकसभेचा निकाल लागेपर्यंत नाथाभाऊंना वाट पाहावी लागू शकते, असं ज्योतिषाची मदत न घेताही सांगता येईल.

शिवसेनेने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. वास्तविक या बदलाचं श्रेय गुलाबराव पाटील यांच्याकडे जायला हवं होतं, पण नितीन लढ्ढा आणि सुनील महाजन यांनी पुढाकार घेत संजय सावंत आणि विलास पाटकर यांच्या मध्यस्थीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना गाठलं. या सगळ्यांनी मिळून सूत्र हलवत भाजपला धक्का दिला. श्रेयवाद जरी बाजूला ठेवला तरीदेखील सत्ता मिळवूनही शिवसेना शहरात छाप सोडेल, अशी स्थिती नाही. महापालिकेत शिवसेनेला दिशा देणारं नेतृत्व नाही. शिवसेनेला जळगाव शहर आणि जिल्ह्यात निर्णायक नेतृत्वाची गरज आहे, ही पोकळी कधी भरून निघेल, हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे. राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, पारोळ्याचे माजी आमदार सतीश पाटील आणि जळगाव ग्रामीणमधील माजी आमदार गुलाबराव देवकर यांनाही जिल्ह्याव्यापी नेतृत्वाची संधी नक्कीच आहे. आपले मतदारसंघ सोडून शहर आणि जिल्ह्याच्या प्रश्‍नांवर आक्रमक भूमिका घेत पुढे आल्यास नेतृत्वाची पोकळी भरून निघण्याची आशा करता येऊ शकते.

-

ता. क. : जळगाव मनपाला निधी मिळावा म्हणून जळगावचे महापौर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना जाऊन भेटतात, ही घडामोड महत्त्वाची मानावी लागेल.

Jalgaon
उत्तर महाराष्ट्रात १६३१ भूमिहीनांना शेतजमिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com