सामाजिक क्षेत्रातील ‘समर्थ व्यक्तिमत्त्व’ : ना. वि. देशपांडे

Aurangabad News
Aurangabad News

“समर्थ बोलवायला लागलेत..सांभाळा आता,” हे वाक्य ऐकताना काळीज गलबलून गेलं होतं.
ती त्यांची शेवटची भेट. तब्येत बघायला दवाखान्यात जाणं झालं. बेड शेजारी उभं राहत हात हाती घेतला आणि ना. वि. काकांचे हे वाक्य आले होते. ज्या वाक्याने दोन गोष्टी सांगितल्या आयुष्यभर समर्थांची ओढ आणि पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे, हे स्वत:लाही समजावून सांगणं!

ना. वि. देशपांडे! या व्यक्तिमत्त्वाची माहिती होती, पण माझा प्रत्यक्ष परिचय फार जुना नाही. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था आणि मराठवाडा विकास परिषदेत अल्पसे काम करताना होणाऱ्या भेटी, फार तर दहा-बारा वर्षांचा संपर्क. बैठकांना आणि अन्य कार्यक्रमाला त्याचं अस्तित्त्व भक्कमपणे जाणवायचं ..खणखणीत आवाज आणि स्पष्ट मांडणी, परखड बोल. यामुळे दरारा वाटायचा..तेव्हढेच ममत्व देखील. कारण नंतरच्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांचं रूप  काहीसं निराळं असायचं.. कुटुंबातील एक मनमिळाऊ ज्येष्ठासारखं. म्हणूनच मग कुटुंबातील सदस्याप्रमाणे मी त्यांना काका कधी म्हणायला लागलो, हे कळलंच नाही.

काकांची स्मरणशक्ती कमाल! यामुळे त्यांनी जे सांगितले, जे दाखले दिले त्याची पुन्हा पडताळणी करण्याचीही गरज कोणत्या प्रसंगी निर्माण झाल्याचे मला तरी आठवत नाही. एकूण निश्चयी आणि सर्वसंचार असलेले हे व्यक्तिमत्व. सीता नवमी ही त्यांची जन्मतिथी आणि काल २ मे रोजी ही तिथी होती, म्हणून हे स्मरण आणि अल्पसे स्फुट.

समर्थ रामदासांचे निस्स्मिम भक्त आणि ग्रंथालय चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, कार्यकर्ते-नेते! आज या चळवळीचे दीपस्तंभ. ग्रामीण भागात ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना दिली, ग्रंथालयांचे जाळे उभे केले या क्षेत्राला वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास त्यांनी घेतलेला पुढाकार अंतिम टप्प्यातही सुरूच होता. लवकरच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या वतीने त्यांच्या नावानेच ग्रंथालयांना पुरस्कार आणि ग्रंथ भेट योजना सुरु होईल. वास्तविक त्यांच्या समक्ष हे सुरु होणार होते आणि ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला पदरचे लक्ष रुपये काढून संस्थेच्या हवाली देखील केले होते.

मूळ परतूरचे असलेले ना. वि. देशपांडे साठच्या दशकात औरंगाबादला येणे आणि लगोलग स्व.गोविंदभाई यांच्या संपर्कात येणे हा योग जुळला आणि मग देशपांडे काकांच्या कार्यकर्ता-नेता या स्वभावाला अनेक मार्ग खुले झाले. यातून अनेक चळवळीत नुसते योगदान नाही, तर नेतृत्वाची आणि दिशा देण्याची संधी लाभली. यातून स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेमध्ये अग्रेसर राहून काकांनी आपले ‘सार्थ’ योगदान देऊ केले.

मराठवाडा विकास चळवळीत आदरणीय गोविंदभाईंबरोबर जी निवडक प्रमुख मंडळी होती, त्यात काकांचा उल्लेख हा सेनानीसारखा, सेनापतीसारखा करावा लागेल. कारण भाईंच्या मार्गदर्शनाखाली काही आघाड्या त्यांनी सांभाळल्या आणि नंतरही समर्थपणे अनेक संस्थांची धुरा सांभाळली. रेल्वे आंदोलन, नामांतर चळवळ, अशा अनेक आंदोलनात ना.वि. देशपांडे यांचे कार्य उल्लेखनीय होते.

मराठवाडा खादी समितीचे आजीव सभासद झाल्यानंतर ना. वि देशपांडे यांनी याही कार्यात आपला ठसा उमटवला. उत्पादन सुधारणा आणि विक्री यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी या चळवळीला अधिक गतिमान केले. आणखी लिहावं ते थोडंच.. औरंगाबादला येण्यापूर्वी हैदराबाद मुक्तीसंग्रामात या कुटुंबाचे योगदान महत्त्वपूर्ण. काकांचे पिताजी वि. वा. देसाई (देशपांडे) हे या संग्रामाच्या पहिल्या फळीतील नेते. तीच ऊर्जा प्रेरणा घेऊन ना.वि.काका किशोरवयात या संग्रामाशी जोडल्या गेले. व्यायामशाळेचे स्वयंसेवक ते तत्कालीन महाराष्ट्र परिषदांच्या कार्यात सहभाग आणि निजामशाही विरोधातील जनप्रबोधन, पत्रक प्रचार असं कार्य होत राहिलं. १९३८ चा सत्याग्रह, १९४२ चे आंदोलन, १९४७ चा जंगल सत्याग्रह असा सहभाग मोठा होता.

समर्थांवर अपार श्रद्धा असलेले हे समर्थ नेतृत्त्व सामाजिक क्षेत्रात खंबीरपणे दिशा देणारे होते. कोणत्याही रंगाचा, कोणत्याही पक्षाचा झेंडा न धरता कार्यशील वृत्तीला आणि आपल्या आतील पराकोटीच्या तळमळीला प्रकट करताना मोठं कार्य उभं करणारे ना.वि. काका आज नाहीत.. पण जन्मतिथी निमित्त स्मरण करताना त्यांच्या कार्याला कायम गतीशील-कृतीशील ठेवणं हीच त्यांना आदरांजली राहील. नतमस्तक !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com