शिक्षण क्षेत्राचे ‘लॉक’ काढायला हवे

the lock of education field to take out now situation in kolhapur blog writing
the lock of education field to take out now situation in kolhapur blog writing

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे. सप्टेंबर संपत आला तरी विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था होती. या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाचे स्वागत करायला हवे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाले. यामुळे सर्वच क्षेत्रे ‘लॉक’ झाली. बारावीची परीक्षा संपली होती, तर दहावीच्या परीक्षेचा भूगोल विषयाचा पेपर राहिला होता. तो पुढे रद्द करावा लागला. सर्वच शाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या नाहीत. आता काही शाखांच्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत, काही शाखांच्या झाल्या आहेत. हे झाले शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० चे; पण २०२०-२०२१ चे करायचे काय? हा प्रश्‍न होताच. दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले तरी महाविद्यालये कधी सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम होता. पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे उर्वरित सत्र पूर्ण कधी होणार, याचीही विद्यार्थ्यांना चिंता होती. आता यूजीसीने जारी केलेल्या ताज्या सूचनेनुसार महाविद्यालये, विद्यापीठांचे कॅम्पस नोव्हेंबरच्या सुरवातीला गजबजणार आहेत.

महाविद्यालये वा विद्यापीठातील शिक्षण विद्यार्थ्यांना आयुष्याची भाकरी मिळवून देते वा यासाठी पूरक कौशल्ये, ज्ञान देते हे खरे; पण त्याही पलीकडे या शिक्षणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील वेगवेगळी व्यासपीठे विद्यार्थ्यांना जीवनशिक्षण देतात, यात शंका नाही. ‘एनसीसी’ देते शिस्त व देशप्रेमाचा धडा. ‘एनएसएस’ची कार्यशाळा सामाजिक बांधिलकीबरोबरच ‘नॉट मी बट यू’ची शिकवण देतानाच ‘श्रम’संस्कारही अंगी बाणवते. विविध स्पर्धांमधून कलागुणांना स्पेस मिळतेच; पण त्याचबरोबर स्पर्धात्मक दृष्टिकोनही रुजतो. नाटक, एकांकिका, अभ्यास सहली, भित्तीपत्रकातील वा वार्षिक विशेषांकातील लेखन, विविध विषयांवरील राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, स्नेहसंमेलन, विविध शिबिरे यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसायाच्या अनुषंगाने दिशा मिळतेच; पण विविधांगी उपक्रमांतील सहभागातून मिळालेली अनुभवाची शिदोरी त्याला आयुष्यभर उपयोगाला येते. पुढील आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षण घेत असताना आत्मसात केलेली कौशल्ये आणि मूल्ये जगण्याचं धैर्य देतात. अनेकांनी त्यांच्या करिअरचा ‘टर्निंग पॉईंट’ कॉलेज लाईफमध्ये असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. म्हणून विद्यार्थी-युवकांना सर्वार्थाने घडवणारी महाविद्यालये, विद्यापीठे आता तरी सुरू व्हायला हवीतच. हळूहळू सारे ‘अनलॉक’ होत असताना शिक्षण क्षेत्राचे ‘लॉक’ काढायलाच हवे होते, विद्यार्थी- युवकांना प्रगती आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या आकाशात झेप घेण्यासाठी...

"विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याची सूचना केली होती. विद्यार्थ्यांच्या अध्यापन, अध्ययनासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे."

- प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com