थोडं जगून पाहूया! 

Make time for yourself
Make time for yourself

खूप दिवसांनी आत्याच्या गावी जाणे झाले. दारातून आत घेताना भाकर तुकडा ओवाळून टाकत, डोळ्यांना पाणी लावून तिने घरात घेतले. (कित्येक दिवसांनी हा अनुभव) इकडच्या तिकडच्या गप्पा, ख्याली-खुशाली, विचारपूस, खाणे यात तीन-चार तास कसे गेले समजलेच नाही. विषय संपत नव्हते आणि पाय निघत नव्हता. गप्पांना आवरते घेतले आणि जाण्यासाठी निघालो. बाहेर पडताना आत्याने हातात हळूच पैसे ठेवले. हे कशाला...असे विचारू लागलो तर..."तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी लहानच आहेस...मला माहिती आहे हे पैसे खूप नाहीत पण तरी माझ्यासाठी घे...' तिचे मन राखण्यासाठी हे पैसे मी खिशात ठेवले आणि निरोप घेतला. 

काही वर्षांपूर्वी गावाहून येताना आजी असेच जवळ घ्यायची. कनवटीचे काही पैसै काढून आठवणीने हातावर ठेवायची आणि तोंडावरून मायेने हात फिरवायची. "जीवाला जप...'म्हणतानाचा तिचा कातर स्वर पुन्हाच्या भेटीपर्यंत सोबत करत रहायचा. मायेचा बंध अधिकच घट्ट करत रहायचा. 

आपल्या रोजच्या जगण्याच्या लढाईमध्ये आता असे क्षण वाटणीला येणे दुर्मिळ बनू लागले आहे. असा मायेचा ओलावा असलेले क्षण कमी-कमी होऊ लागले आहेत. हे कोणीही मुद्दाम करते असेही नाही. परिस्थिती...वेळ...वाढती स्पर्धा...जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष यामध्ये आपण सगळेच एवढे गुरफटू लागलो आहे की यातून अशा अनेक छोट्या-छोट्या आनंददायी क्षणांना मुकतो आहोत. हे क्षण आपण मिळवू शकतो का? याचे उत्तर नक्कीच "मिळवू शकतो'. यासाठी फक्त थोडे स्वतःच्या अनावश्‍यक महत्त्वाकांक्षांना मुरड घालायला हवी...आपणच आपल्याला वेळ द्यायला हवा. आपल्या कुटुंबासोबतचा संवाद वाढवायला हवा...आपल्या जगण्याची दिशा खरेच योग्य आहे की नाही हे पडताळून पहायला हवंय. स्वतःचा स्वतःशी संवाद वाढायला हवा. आपण इतरांना वेळ दिला की आपल्यासाठीही कोणीतरी आवर्जुन वेळ काढते हे ध्यानात घ्यायला हवंय. व्यवहारापलीकडे जाऊन नात्यांची बूज राखण्याचा प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. नव्या जगात एकत्र कुटुंबपद्धतीपासून आपण दूर निघालो आहोत. ते गैरही नाही; मात्र "मी आणि माझं' अशी वृत्ती वाढीस लागत आहे हे घातक आहे. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा तयार होऊ लागला आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहण्याऐवजी कधीतरी भावनेनेही निर्णय घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. खोट्या प्रतिष्ठेत अडकण्यापेक्षा प्रेमाच्या माणसांसोबत जगणं सुंदर कसे करता येईल हे पहायला हवंय. 

आजी-आजोबांची मायेची सय अनुभवायची असते याचे संस्कार आपणच येणाऱ्या पिढीवर नाही केले तर पुढे जाऊन आपलीच मुले आपल्यापासून दुरावण्याचा धोका आहे. तुम्हीच जर तुमच्या नातेवाईकांसोबत जोडलेले राहिला नाहीत तर तुमची मुले आपोआपच त्यापासून दूर जाणार आहेत. त्यांची या नात्यांसोबत ऍटचमेंटच होणार नाही. आभासी जगातील मित्रांपेक्षा आपली हाडामासाची माणसे जरा गोड बोलली तरी आपल्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार होतील. फक्त हे जाणून घेण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी थोडा अहंकार बाजूला ठेवायला हवा. त्यांच्यासोबत संवाद वाढवायला हवा. लहानपण स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी. मोठेपणाची झूल उतरून ठेवण्याची तयारी हवी. त्यांच्या मायेच्या हातामध्ये आपला हात देताना तो मायेनेच दिला जातोय ना हे पहायला हवंय. थरथरत्या, सुरकुतल्या हातांचा स्पर्श अभिमानाने मिरवायला हवा. तो स्निग्ध स्पर्श हे जगण्याचे संचित आहे. ते संचित आपल्या आयुष्याला कसे जोडले जाईल हे पहायला हवंय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे "मी' पणाला मुठमाती देऊन आपलेपणाचा मंत्र अंगिकारायला हवंय. जगून पाहताना... पहा जगण्यातील रंग आणखी खुलून येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com