शेतकऱ्यांना सच्छिद्रमुळे मिळाला दिलासा....

perforated pipe projects in shirol kolhapur marathi news
perforated pipe projects in shirol kolhapur marathi news

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍याला अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत मुबलक पाणी. या तालुक्‍यातून वारणा, कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा नद्या वाहतात. त्यामुळे पाणीटंचाई नाही. येथील जमिनीही काळ्या कसदार. त्यामुळे उत्पन्नही भरघोस. मुबलक पाण्यामुळे पाणीटंचाईची धास्ती येथील शेतकऱ्यांना नाहीच. त्यामुळे शेतीला पाणीही भरपूर दिले जायचे. हेच अतिरिक्त पाणी शेतीसाठी मारक ठरू लागले.

केवळ हे पाणीच नव्हे, तर जादा उत्पन्नासाठी केलेला रासायनिक खतांचा अतिरिक्‍त वापर, रस्त्यांची वाढलेली उंची, ओढ्यांची अरुंद झालेली पात्रे आदी कारणांमुळे येथील जमिनींत पाणी साचून राहू लागले. त्यामुळे या जमिनी पाणथळ झाल्या. त्यांच्यातील क्षाराचे प्रमाण वाढून त्या क्षारपड बनल्या. ज्या जमिनींमध्ये ‘मापट्याने पेरले की पोत्याने मिळायचे,’ त्या जमिनींमध्ये काटेरी झुडपे वाढू लागली. जमिनी नापीक बनल्या.

१९८० च्या दशकात शिरोळ तालुक्‍यातील शिरोळ, कुटवाड, कनवाड, घालवाड, हसूर, शेडशाळ, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, आकिवाट, मजरेवाडी, उदगाव, चिंचवाड, कोथळी, शिरढोण, अब्दुललाट यांसारख्या तालुक्‍यातील ७० टक्के गावांतील जमिनी क्षारपड होऊ लागल्या.यातून बाहेर पडण्यासाठी काही वर्षांनंतर प्रारंभ झाला. २०१६ मध्ये शिरोळच्या दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांत सच्छिद्र पाईपलाईनबाबत प्रबोधन सुरू केले. वैयक्तिक, समूह चर्चा, विचारविनिमय या माध्यमातून जागृती सुरू केली. तसेच क्षारपडग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या.

या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सच्छिद्र पाईपसाठी लागणारे कर्ज वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून दिले. सच्छिद्र पाईपमुळे शेतात साचलेले जादा पाणी बाहेर काढले. ही पाईप मुख्य पाईपला जोडली. मुख्य पाईपलाईन बंदिस्त केली. त्यामुळे ज्या शेतकऱ्याच्या शेतातून ती जाणार त्याचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. या मुख्य पाईपलाईनद्वारे पाणी पुन्हा नदीत नेऊन सोडले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून या क्षारपड जमिनीतून उत्पन्न मिळू लागले.

२०१७ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. २०१८-१९ मध्ये यातील काही जमिनीतून उसाचे उत्पन्न घेतले. दत्त कारखान्याबरोबरच शरद सहकारी साखर कारखाना आणि गुरुदत्त शुगर्स यांनीही शेतकऱ्यांच्या प्रबोधनास सुरवात करून त्यांनाही सच्छिद्र पाईपलाईनसाठी उद्युक्त केले. यंदा शेतकऱ्यांनी उसाबरोबरच गहू, शाळूचे उत्पादन घेतले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात २५-२६ वर्षांनंतर उत्पन्न आले. जी जमीन नापीक झाली होती ती पुन्हा सुपीक झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकतीच शिरोळ तालुक्‍यास भेट देऊन क्षारपड जमिनीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांचे कौतुक केले. या शेतीच्या सातबारावरील ‘क्षारपड’ हा शेरा काढून टाकण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. हा शेतकऱ्यांसाठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

क्षारपड जमिनीत सच्छिद्र पाईप प्रकल्पामुळे उसाबरोबर इतर पिकेही घेतली जात आहेत. क्षारपड जमिनी कधी पिकाखाली येतील असे वाटले नव्हते. आता मात्र या प्रकल्पामुळे अनेक गावांतील क्षारपड जमिनी पिकाखाली येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
- सुकुमार शिरगुप्पे, शेतकरी, बुबनाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com