मराठवाड्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण जन्मतःच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले तीन युवराज आज मराठवाड्यामध्ये आहेत. यावर्षी अतिवृष्टीने मराठावाड्यात हाहाःकार माजवला. साधारण चार हजार गावांना याचा फटका बसला आहे. मराठावड्यात अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न आणि एकूणच मराठावाडा काय आहे, हे युवराजांना कळेल का? हाच प्रश्न आहे.
देशभरात काँग्रेसची पडझड झालेली आहे. निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचं तोंड बघावं लागत आहे. पक्षातच मरगळ आल्याचं चित्र आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' सुरु केलीय. देशभरामध्ये ही यात्रा जात आहे. आज नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये रात्री साडेसात वाजता राहुल दाखल होतील. 7 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रात ही यात्रा असेल. यात्रा 382 किमीचा प्रवास करेल. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, जामोद या भागातून ही जाईल. नंतर ही यात्रा मध्य प्रदेशच्या दिशेने जाईल. आज संध्याकाळी राहुल गांधींच्या उपस्थितीत देगलूरमध्ये मशाल यात्रा निघेल. परंतु या मशालीच्या उजेडात युवराज राहुल गांधींना मराठवाड्यातलं वास्तव कितपत दिसेल, हा खरा प्रश्न आहे.
राहुल गांधी
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
शेतकरी या यात्रेमध्ये सहभागी होतीलही. परंतु यावर्षी त्यांच्या पदरामध्ये काय विस्तवाचे निखारे पडलेत, हे राहुल यांना निदान समजलं तरी पाहिजे. जुलै महिन्यातल्या अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली होती. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने १७ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्याचा परिणाम २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांवर झाला. जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने १२ लाख ४९ हजार ७३१ हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं होतं. खरीप हंगामामध्ये यावर्षी ३० लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेलं आहे. महसूल विभागाची ही आकडेवारी आहे. वास्तव यापेक्षा भयंकर असू शकतं.
Rahul Gandhi on Maharashtra tour
Rahul Gandhi on Marathwada tour
आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray Shivsena Udhhav Balasaheb Thackeray
राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये शेतीच्या बांधावर जाणार आहेत. सिल्लोड हा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे. अब्दुल सत्तार यांनी मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्यांवर आक्रमक टीका केली. आदित्य ठाकरे यांना थेट छोटा पप्पू म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल गाठलेली. खरं तर त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य सिल्लोडमध्ये जात असल्याचं म्हटलं जातंय. मग शेतीच्या बांधावर जाण्याचं नाटक कशासाठी? दोन आठवड्यापूर्वीच उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आणि बांधावर गेले होतेच की. कसलीही राजकीय टिपण्णी न करता शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यासाठी नियोजित लढा, उभा करणं गरजेचं आहे. तसं केलं तर युवराज आदित्य यांचा दौरा कामाचा होता, असं म्हणता येईल. नाहीतर मराठवाड्याची आणखी एकदा थट्टा...
Aditya Thackeray on Marathwada tour
श्रीकांत शिंदे
Srikanth Shinde on Marathwada tour
तिसरे युवराज, मुख्यमंत्रीपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील सिल्लोमध्ये आहेत. सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा होणार आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून या सभेसाठी गेल्या तीन दिवसांपासून तयारी सुरू आहे. सभेला सभेने उत्तर, दौऱ्याला दौऱ्याने उत्तर; असं नवीन राजकारण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. श्रीकांत शिंदे हे आपली स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असं असलं तरी ते मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. एकवेळ शेतीचं बाजूला ठेवा. मराठवाड्यातील पोरांना रोजगार द्यायचा निश्चय जरी श्रीकांत यांनी केला तरी हजारो बेरोजगार पोटापाण्याला लागतील. कारण त्यांच्या हातात सत्ता आहे.
पण तसं होईल का? याबाबत शंका आहे. या सुखवस्तू युवराजांना मराठवाडा आणि त्याचे प्रश्न कळायला मनात जिव्हाळा ठेवावा लागेल. उद्या हे युवराज निघून जातील. पण 'प्रश्न' मागे उरतील.
Chief Minister Eknath Shinde's son MP Shrikant Shinde
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.