नागपंचमीच्या दिवशी आमच्या गावात पारावर एक आजी नागपंचमीची प्रचलित गोष्ट सांगायची ,तीच गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वाचा नागोबा देवाची, नागपंचमीची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या. चातुर्मास्यांत श्रावणमासातील नागपंचमीचा दिवस जवळ आला होता. त्यामुळे सुना या कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरी, अशा सगळ्या सुना या माहेरी गेल्या होत्या. पण ब्राह्मणाची सर्वांत धाकटी सून होती तिला तिच्या माहेरचं कोणीचं मुऱ्हाळी आला नव्हता. त्यामुळे ती जरा खिन्न झाली.आणि ती तिच्या मनातच नागोबा देव आहे असं समजूत काढु लागली. नागोबा मला माहेराहून मुऱ्हाळीयेईल, असं म्हणूं लागली.
पुढच्या काही वेळातच काय झालं माहिती का ? शेषभगवानास तिचीं करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरितां तिच्या घरी आला. तेव्हा त्या मुलीचा सासरा विचारात पडला की माणूस आहे तरी कोण ? हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आताच कस काय अचानक आला ?
त्यानं त्याच्या सुनेला विचारलं की कोण आहे हा माणूस ? तेव्हा तिनं सांगितल की हा माझा मामा आहे.मनातील प्रश्नाच उत्तर भेटल्यानंतर मग ब्राह्मणानं आपल्या सुनेला त्या ब्राम्हणासोबत पाठवायला होकार दिला. पुढे त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळांत नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि आपल्या बिळांत घेऊन गेला. सापानं आपल्या बायकांमुलांना सकद ताकीद देऊन सांगितल,की हिला कोणीं चावू नका.
पुढे एके दिवशीं नागाची नागीण बाळातीन होऊं लागली, तेव्हां नागान हिला हातात दिवा धरायला सांगितलं. तिने पिलांना जन्म दिला, तिचीं पिलं वळवळ करूं लागली. ही मुलगी त्या सापांना पाहून घाबरून गेली. त्यामुळे तिच्या हातांतला दिवा खालीं पडला. आणि नागिनीच्या नुकताच जन्मलेला पिल्लाची शेपूट भाजलीं. त्यामुळे नागीण चांगलीच संतापली .आणि तिने घडलेली सगळी हकीकत तिच्या नवर्याला म्हणजे नागाला सांगितली.
तो म्हणाला, “तिला लवकरच सासरीं पोचवूं.”
पुढे मग सापाने मनुष्यदेह धारण करून तिला सासरीं पोहचवले. पुढे मग नागाचीं पोरं मोठी झाली. तेव्हा ते त्याच्या आईला विचारु लागले की आमची शेपूटं कशानं तुटली ग आई ? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते त्या मुलीच्या घरी गेले.
हा दिवस होता, नागपंचमीचा दिवस. या मुलीने पुष्कळ वेळ आपल्या भावांची वाट पाहिली. ते येत नाहींत म्हणून पाटावर व भिंतीवर रंगाने नागांची चित्रं काढलीं. त्यांची पूजा केली. नागांनाच्या चित्राजवळ लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांचीं पिलं पहात होतीं. सरतेशेवटीं तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत.” असं म्हणुन नमस्कार केला. इकडे नागांच्या पिल्लांनी हा सर्व प्रकार त्यांनीं पाहून मनांतील सर्व राग घालविला. तिच्या आपोआप त्या पिल्लांच्या मनात दया आली.नागांच्या पिल्लांनी मग त्या दिवशी तिथचं राहिले.त्या बाईने जिथे पुजा केली होती तिथेच , नागांच्या पिल्लांनी एक नवरत्नांचा हार ठेवून ते आपल्या मार्गाने निघून गेले. दुसर्या दिवशी तिनं तो हार उचलून मोठ्या आनंदाने गळ्यांत घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हांआम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.