भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने केलेले हे व्रत. आपल्या पतिच्या दिर्घायु तथा संसारात सुख समृद्धी प्राप्त व्हावी, चांगला पती मिळावा यासाठी सौभाग्यवती स्त्रीयांसह मुलीसुद्धा हरितालिका हे व्रत करतात. हे व्रत करताना वाळूच्या शिवलिंगाची पुजा केली जाते. याचसोबत हरितालिकेची कथा वाचन श्रवण करण्यालाही विशेष महत्व आहे. हरितालिकेच्या कथेमध्ये पार्वतीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी केलेल्या घोर तपश्चर्येसह व्रताचा महिमा वर्णिला आहे. काय आहे हरितालिकेची कथा जाणून घ्या.
कथा हरितालिकेची
एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीन शंकराला विचारले, "महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? मोठे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, "नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णु श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. आता तु मला कशी प्राप्त झालीस ते तुला सांगतो.
मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाल्लीस. ऊन, पाऊस, वारा ही तिन्ही दुःख सहन केलीस.. तुझे श्रम पाहून तुझ्या पिता हिमालयाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालमाने त्यांचे स्वागत पूजन करुन येण्याचं कारण विचारलं, तेव्हा नारद म्हणाले, "तुझी कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी. तोच तिच्यासाठी योग्य वर आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे. म्हणून मी आलो इथे आहे. आपल्या कन्येचा स्विकार स्वतः विष्णूदेव करणार हे ऐकल्यावर हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे गेले. त्यांना ही हकीकत कळविली.
नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं तुला ही गोष्ट सांगितली, मात्र ही गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. हे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्चय आहे. असे असूनही माझ्या पित्यानं मला विष्णूला देण्याचे कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथे एक नदी तुमच्या दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापन केलीस. त्याची मनोभावे पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस, त्या पुण्याईने माझे इथलं आसन हललं, अन् मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं,
तू म्हणालीस, "तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही." नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा पिता हिमालय तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशाप्रकारे या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असं म्हणतात.
हे व्रत कसे करावे ...
"ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. वाळूच्या साहाय्याने पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. पुढे रांगोळी घालावी. त्याची मनोभावे पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं पापापासून मुक्त होतो. सात जन्माचं पातक नाहीस होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं."
ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.