नवी दिल्ली (पीटीआय) : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात गेल्या आठवड्यात भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर येऊन तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांमध्ये कमांडर पातळीवर चर्चा होऊन काही तासांनंतर हा तणाव दूर करण्यात आला, अशी माहिती आज या घटनेशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिली. चीनच्या सुमारे शंभर सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना पिटाळून लावले, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
काही आठवड्यांपूर्वी उत्तराखंडमधील बाराहोती भागात चीनच्या सुमारे शंभर सैनिकांनी ताबा रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातील अरुणाचल प्रदेशातील घटना घडली आहे. पूर्व लडाखमधील तणावाबाबत दोन देशांदरम्यान लष्करी पातळीवरील चर्चा काही दिवसांत होणार आहे. त्यामुळेही या घटनेचे गांभीर्य आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झटापट झाल्याचेही सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजते. भारतीय हद्दीत आलेल्या काही चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
‘चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित नसल्याने प्रत्यक्ष ताबा रेषा कोणती, याबाबत दोन्ही देशांची भूमिका वेगवेगळी आहे. दोन देशांमध्ये झालेल्या करार आणि मार्गदर्शक सूचनांच्या आधारावरच सध्या सीमेवर शांतता राखली जाते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.