नवी दिल्ली - वादात सापडलेल्या अग्नीवीर भरती योजनेसाठी भारतीय हवाई दलाकडे पहिल्या केवळ ६ दिवसांत तब्बल २ लाखांहून जास्त युवकांनी ऑनलाईन अर्ज केल्याची माहिती आज देण्यात आली. येत्या ५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. या योजनेत ४-४ वर्षांसाठी दरवर्षी ४५ हजारांहून जास्त तरूणांची भरती करण्यात येईल. ४ वर्षांनी त्यातील ७५ टक्के तरूणांना सैन्यदलांतून सेवामुक्त केले जाईल. हवाई दलाने या तरूणांना ‘अग्नीवीरवायू ‘ असे संबोधन दिले आहे.
भगवतगीतेच्या ११ व्या अध्यायातील २४ व्या श्लोकावरून घेतलेले ‘नभःस्पर्शम् दीप्तम'(आकाशाप्रमाणे दैदिप्यमान असणारे) हे आदर्श वाक्य असलेल्या हवाई दलामध्ये अग्नीवीर योजनेत ३५०० जागा भरण्यात येणार आहेत. अग्नीवीर योजना घोषणेपासूनच वादात सापडली असून बिहार व उत्तर प्रदेशासह देशाच्या काही राज्यांत या योजनेच्या विरोधात तरूणांचे आंदोलन सुरू आहे.
बिहारमध्ये आंदोलकांनी रेल्वे गाड्यांची जाळपोळ सुरू केल्याने आजही रोज किमान सव्वाशेहून जास्त गाड्या रोज रद्द कराव्या लागत आहेत. मात्र प्रचंड विरोध होऊनही मोदी सरकार ही योजना अंमलात आणण्यावर ठाम आहे. योजनेची घोषणा १४ जून रोजी झाली. त्यानंतर दहा दिवसांतच सर्वप्रथम हवाई दलाने २४ जूनपासून यासाठी अर्ज मागविण्यास सुरवात केली.
यासाठी १७ वर्षे ५ वर्षे ते २३ वर्षांपेक्षा कमी अशी वयोमर्यादा असेल. म्हणजेच २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५ या दरम्यान जन्म झालेले तरूण यासाठी अर्ज करू शकतात. विज्ञान शाखेच्या उमेदवारांसाठी गणित, भौतिकशास्त्र व इंग्रजीसह १२ वी परीक्क्षेत किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत.
हवाई दलातर्फे आज देण्यात आलेल्या माहितीनुसार हवाई दलाकडे अग्नीवीरांच्या भरतीसाठी रविवारपर्यंत ५६,९६०, सोमवारपर्यंत ९४,२८१ अर्ज दाखल झाले होते. आज हवाई दलाने केलेल्या ट्विटनुसार नोंदणीकरण संकेतस्थळावर आजअखेर २ लाख ०१ हजार युवकांनी अर्ज केले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.