पक्षाची सूत्रे पलानीस्वामींकडेच

अण्णाद्रमुकमधील वाद : पनीरसेल्वम यांची सदस्यपदावरून हकालपट्टी
aiadmk tussle setback for o panneerselvam madras high court allows meeting called by rival e palaniswamy
aiadmk tussle setback for o panneerselvam madras high court allows meeting called by rival e palaniswamysakal

चेन्नई : तमिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकच्‍या हंगामी सरचिटणीसपदी एडाप्पडी के. पलानीस्वामी ऊर्फ ‘ईपीएस’ यांची निवड झाली आहे. पक्षात एकल नेतृत्वावरून जे. जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षात वर्चस्वाच्या वादावरून ओ. पनीरसेल्वम ऊर्फ ‘ओपीएस’ आणि पलानीस्वामी या दोन नेत्यांमधील वाद मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला होता. यावर आज निवाडा देत न्यायालयाने पलानीस्वामींच्या बाजूने निर्णय दिला.

पलानीस्वामी यांनी बोलाविलेल्या पक्षाच्या बैठकीवर स्थगिती आणावी अशी मागणी पनीरसेल्वम यांनी केली होती. पण बैठकीवर स्थगिती आणण्यास कोणतेही कारण दिसत नसून पक्षाच्या अंतर्गत बाबींत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोर्टाच्या मंजुरीनंतर पलानीस्वामी यांनी कार्यकारिणीची बैठक घेतली. त्यात त्यांची हंगामी सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसेच ओ. पनीरसेल्वम यांची प्राथमिक सदस्यपदावरून व खजिनदारपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

पनीरसेल्वमचे समर्थकांनाही काढून टाकले. पक्षाच्या कार्यकारिणी समितीमध्ये १६ ठराव मांडण्यात आले आहेत. यापैकी एक पक्षातील दुहेरी नेतृत्व रद्द करण्याची मागणी करणारा व हंगामी सरचिटणीस म्हणून पलानीस्वामी यांची निवड करणारा दुसरा ठराव आहे. या बैठकीत समन्वयकांची पदे रद्द करण्याचा ठराव मंजूर झाला. सध्या समन्वयकपदी पनीरसेल्वम होते तर सहसमन्वयक पलानीस्वामी होते. यानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यालयात धरणे धरले. जयललिता यांची कायमस्वरूपी सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर आणि हे पद त्यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर हंगामी सरचिटणीस हे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

पनीरसेल्वम यांचा हेका

पक्ष नेतृत्वाच्या वादातून अण्णाद्रमुक पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. मोजकेच वरिष्ठ नेत बरोबर असूनही पनीरसेल्वम हे पद सोडण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे पलानीस्वामी यांना ९० टक्के वरिष्ठ नेत्यांची साथ लाभली आहे. पलानीस्वामी यांची पक्षाच्या मुख्यालयावरील ताबा सोडण्यासही नकार दिल्याने अण्णाद्रमुक त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

पक्षाची सूत्रे हाती घेणार ः शशिकला

पलानीस्वामी व पनीरसेल्वम या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक वादाचा पक्षाच्या नेत्या व जयललिता यांच्या मैत्रीण व्ही. के. शशिकला यांनी निषेध केला आहे. या नेत्यांना मी यापूर्वीच पक्षातून काढले होते, असे सांगत लवकरच पक्षाची सूत्रे हाती घेणार असल्याचे शशिकला यांनी सांगितले.

‘भारतरत्न’साठी ठराव

तमिळनाडूचे विवेकवादी नेते ई.व्ही. रामस्वामी, माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई व जयललिता यांना भारतरत्न सन्मान देण्याची मागणी केंद्राकडे करण्याचा ठरावही आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

अण्णाद्रमुकचे नेते इडापडी के. पलानीस्वामी (इपीएस) आणि ओ. पनीरसेल्वम (ओपीएस) यांच्यातील सर्वोच्चपदाच्या वादावर मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी सोमवारी हिंसक वळण घेतले. पक्षाच्या मुख्यालयाबाहेर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. दगडफेक करीत कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यानंतर कतमिळनाडू सरकारने अण्णाद्रमुकच्या मुख्यालयाला टाळे ठोकळे.

चेन्नईतील वनरगम येथे आज सकाळी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी पलानीस्वामी हे कार्यकर्त्यांसह जात असताना पनीरसेल्वम यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी अण्णाद्रमुकच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. दगडफेक, लाकडाचे ओंडके फेकून हाणामारी झाल्याने नेतृत्ववाद हिंसेपर्यंत पोहचल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी, दोन नागरिक व एक छायाचित्रपत्रकार जखमी झाल्याचे सांगण्यात आले. परिसरात उभ्या असलेल्या मोटारी, अन्य वाहने व बसचेही मोठे नुकसान झाले. यामुळे अण्णा द्रमुकचे कार्यालयाला युद्धभूमीचे रूप आले होते.

कार्यकर्त्यांवर लाठीमार

गोंधळाच्या वातावरणात पनीरसेल्वम यांनी पक्षाच्या मुख्यालयात प्रवेश केला. तेथे पक्षाचे संस्थापक एम.जी. रामचंद्रन आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ‘मीच पक्षाचे प्रमुख आहे,’ असा दावा करीत त्यांनी गच्चीतून त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. त्यांच्यासोबत वरिष्ठ नेते वैतीलिंगम, मनोज पंडियान आणि जे.सी.डी. प्रभाकरण होते. पनीरसेल्वम यांना बाहेर काढण्यासाठी पलानीस्वामी यांचे समर्थक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस व विशेष दलाने दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.

पनीरसेल्वम हे द्रमुक पक्षाच्या हातातील बाहुले आहेत. अण्णाद्रमुकच्या मुख्यालयात झालेल्या हिंसाचाराला तेच जबाबदार आहेत. पनीरसेल्वम यांनी पक्षकार्यालय आणि त्यातील जयजलिता यांच्या कक्षातून कागदपत्रे पळविली आहेत.’’

- के. पलानीस्वामी, हंगामी सरचिटणीस, अण्णाद्रमुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com