Amit Shah : ''CAA ला कोणीही रोखू शकत नाही'' पश्चिम बंगालमध्ये जावून अमित शाहांनी स्पष्ट केली भूमिका

home minister amit shah
home minister amit shah esakal

कोलकताः देशामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सभेत बोलताना केले. तृणमूल काँग्रेसवर टीका करताना त्यांनी राज्य सरकार हे लांगूलचालनाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला तसेच पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

शहा म्हणाले, ‘‘ नागरिकत्व कायदा हा देशाचा कायदा असून केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी करेल. त्याची अंमलबजावणी करण्यापासून कुणीही आम्हाला रोखू शकत नाही.’’

राज्यातील राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाच्या राजकारणावर प्रहार करताना ते म्हणाले, ‘‘ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला उद्‍ध्वस्त केले आहे.’’ ‘‘ सोनार बांगला’ अन् ‘मा माटी मानूष’ याचे आश्वासन देताना ममतादीदींना कम्युनिस्टांना सत्तेतून बाहेर फेकले होते. पण हे सत्तांतर होऊन देखील राज्यात बदल झाला नाही. आजही राज्यामध्ये घुसखोरीचे प्रकार, लांगूलचालनाचे राजकारण आणि राजकीय हिंसाचार हे सगळे होतेच आहे. डाव्यांनी २७ वर्षे बंगालवर राज्य केले होते. ममतांनाही सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता मिळाली पण त्यांनी राज्याची वाट लावली. राज्यातील घुसखोरी ममतांना रोखता आलेली नाही. घुसखोरांना उघडपणे मतदार ओळखपत्रे आणि आधार कार्डांचे वाटप केले जात आहे. हे डोळ्यासमोर घडत असताना मुख्यमंत्री मात्र शांत आहेत,’’ असे शहा म्हणाले.

जनता बदला घेईल

‘‘ राज्यात २०२६ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांच्या हत्या झाल्या होत्या, राज्यातील जनता आता हत्येचा बदला घेईल. बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात सर्वाधिक हिंसाचार होतो. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्याही हत्या झाल्या आहेत. आता २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सगळ्याचा बदला घेईल,’’ असे शहा यांनी सांगितले.

डावा कट्टरतावाद संपविला

केंद्रातील भाजपचे सरकार राज्यातील लोकांसाठी मोठा निधी पाठवते पण तृणमूलची सिंडिकेट हा निधी त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही. पंतप्रधान मोदींनी अवघ्या देशातून दहशतवादाचे उच्चाटन केले असून जम्मू- काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम हटविण्याचे काम त्यांनीच केले आहे. देशातून डावा कट्टरतावाद संपुष्टात आला असल्याचे शहा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com