Ayodhya Ram Mandir : ‘अयोध्ये’वरून शिवसेनेचे दोन गट आमनेसामने

अयोध्येत उभारण्यात आलेल्या राममंदिराच्या उभारणींवरून आज लोकसभेतील चर्चेत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
Arvind Shinde and Shrikant Shinde
Arvind Shinde and Shrikant ShindeSakal

नवी दिल्ली - अयोध्येत उभारण्यात आलेल्या राममंदिराच्या उभारणींवरून आज लोकसभेतील चर्चेत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांनी दावे आणि प्रतिदावे केले.

नियम १९३ नुसार आज राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेवर आज लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या खासदारांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी राममंदिराच्या निर्माणातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे आज राममंदिराचे काम पूर्ण होऊ शकले.

राममंदिर व्हावे, ही काँग्रेसच्या नेत्यांना वाटत नव्हते. परंतु हे स्वप्न मोदी यांच्यामुळे पूर्ण झाले. मुस्लिम शासकांनी अन्याय केले. अनेक शहरांची नाव बदलली. यामुळे आज राज्य सरकारने औरंगाबादचे नाव हे छत्रपती संभाजीनगर केले. यासाठी काही पक्षांनी विरोध केला होता. या चुकांचे प्रायश्चित्त आता या पक्षांच्या नेत्यांनी घेतले पाहिजे, असे म्हणत डॉ. शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले.

खंजीर खुपसून राज्य नाही

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर भाषण करताना हिंदुत्वावर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीला भाजपने विरोध केला होता, याचा दाखला दिला. बाबरी मशीद पाडली तेव्हाही भाजपने जबाबदारी नाकारली होती, परंतु बाळासाहेबांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.

श्रीरामाने कधीही पाठीत खंजीर खुपसून राज्य केले नाही. श्रीरामाने सत्तेची हाव धरली नाही. राममंदिराचे स्वागत आहेच, त्याचवेळी श्रीरामाच्या गुणांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सावंत बोलताना खासदार राहुल शेवाळे अडथळे आणत होते.

अर्थसंकल्पी भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी वाचलेली हिंदीतील कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आजही राममंदिराच्या चर्चेत भाग घेताना खासदार कोल्हे यांनी ‘मेरे राज्य में रामराज्य कब आयेगा’ ही कविता म्हणून दाखविली. श्रीरामाची उदारता, शुचिता हे अनुकरणीय गुण असून श्रीरामाने कट्टरता कधीही शिकविली नाही. राम मंदिर हे राजकारणाचे साधन होऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘नवी संसद न्यायाचे प्रतीक’

संसदेची नवी इमारत ही न्याय, सुशासन व संसदीय शुचिताचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. १७ व्या लोकसभा अनिश्चित काळासाठी आज संस्थगित करण्यात आली. बिर्ला म्हणाले, पाच वर्षात सरकार व विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या सहकार्याने देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

या काळात सभागृहाची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे, याकडे माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. यात काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागले. परंतु सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचे कर्तव्य सर्व सहकार्याचे आहे. हा काळ खूप आव्हानात्मक होता. कोरोना काळामुळे हे आव्हान अधिक किचकट झाले होते.

परंतु सदस्यांच्या सहकार्यामुळे यातूनही आपण बाहेर आलो आहोत. यामुळे या पाच वर्षाच्या काळात एक हजार तासांपेक्षा अधिक कार्य होऊ शकले व अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले. १७व्या लोकसभेत पाच वर्षांत २२२ विधेयके मंजूर करण्यात आली, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात गुंडाराज सरकार : खर्गे

भाजपने चोरी करून सत्ता हस्तगत केलेल्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून या राज्यात गुंडाराज सरकार असल्याच्या शब्दात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सुरू असलेल्या हत्यासत्रावर आज खर्गे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसने नेहमीच महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था चांगली राखली. त्यामुळेच महाराष्ट्राचा आर्थिक विकास होऊ शकला, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com