
नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरपडताळणीला (एसआयआर) काँग्रेसकडून होत असलेला विरोध म्हणजे घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ‘‘काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून घटनात्मक संस्थांवर आरोप केले जात आहेत. या लोकांनी सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. निवडणुकीत जर गैरप्रकार झाला असेल तर सर्वप्रथम राहुल गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे,’’ अशी टिपणी पात्रा यांनी केली.