Tripura Elections 2023 : भाजपला ५० पेक्षा अधिक जागा मिळतील

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना विश्वास; डबल इंजिन सरकारचा फायदा
BJP will get more than 50 seats CM Manik Saha Tripura Double Engine Govt politics
BJP will get more than 50 seats CM Manik Saha Tripura Double Engine Govt politicssakal

आगरताळा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारुढ भाजप पक्षासाठी विकास हाच मुख्य मुद्दा असेल आणि ५० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी व्यक्त केला. त्रिपुरा राज्यात ६० जागांसाठी येत्या १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

मुख्यमंत्री साहा हे आज आपला मतदारसंघ बार्डोवली येथे ‘घर घर प्रचार’ अभियानात सामील झाले होते. तेव्हा ते बोलत होते. साहा म्हणाले, की आज मी कोठेही गेलो तरी लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहावयास मिळते.

कारण त्यांना भाजपच्या डबल इंजिन सरकारचा लाभ मिळाला आहे. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत भाजप आघाडीला ५० पेक्षा अधिक जागा मिळतील, अशी मला खात्री आहे.

ईशान्य राज्यांच्या विकास काम वेगाने सुरू असून ते पुढेही चालू राहावे, असे लोकांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याने रस्त्यापासून ते इंटरनेट आणि रेल्वेपर्यंत सर्वच आघाडीवर विकासाचे चित्र अनुभवले आहे.

त्यामुळे राज्यातील जनता पुन्हा भाजपला सत्तास्थानी बसवेल. माकप व कॉंग्रेस आघाडीवर टीका करताना म्हटले, की त्रिपुरात ही अनसैगिक आघाडी असून या अभद्र आघाडीला लोक नाकारतील.

एकेकाळी राज्यात सत्ता गाजवणारे विरोधी पक्ष कोणत्या तोंडाने लोकांकडे मत मागण्यास जातील, यावरून मला प्रश्‍न पडतो. संधीसाधू करत त्यांनी तडजोड केली असून आगामी निवडणुकीत ते शून्यावर येतील, असाही दावा त्यांनी केला.

साहा यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हटले, की विरोधकांकडे आता कोणतेच मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते टीका करत आहेत.

‘आयपीएफटी’ नेते टिपरा मोथा यांच्यासमवेत चर्चा सुरू करण्याबाबत साहा म्हणाले, की त्यांनी भाजपसमवेत चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. आयपीएफटी नेत्यांबरोबरच बैठक होईल आणि आघाडी किंवा जागा वाटप यावर त्यांचे मत जाणून घेऊ, असेही त्यांनी नमूद केले.

मेघालयातील ३४ मतदारसंघ संवेदनशील

शिलाँग : मेघालयातील सुमारे ३४ मतदारसंघ हे निवडणुकीत पैसे वाटपाबाबत संवेदनशील म्हणून निश्‍चित करण्यात आले आहे. तसेच ७४७ मतदान केंद्रे ही ‘असुरक्षित’ आणि ३३९ मतदान केंद्रे ही ‘अति संवेदनशील’ म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत.

या मतदारसंघामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवावा आणि सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे असे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मेघालयात फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने निवडणुकीदरम्यान, मेघालयात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या १२० तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com