केंद्र सरकार गंगेतील मैलापाणी विकणार

‘इंडियन ऑइल’ला गरजेनुसार पुरवठा; मथुरेतून प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू
ganga-river
ganga-riversakal

नवी दिल्ली : भारताची जीवनरेखा मानली जाणाऱ्या गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. गंगेच्या पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर त्यातून जमा झालेल्या मैला पाण्याची विक्री करून त्यातूनही पैसे कमावण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

केंद्र सरकार हे मैलापाणी लवकरच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला (आयओसीएल) विकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गंगेच्या खोऱ्याचा विचार केला तर दररोज अंदाजे १२ अब्ज लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात मैलापाणी जमा होऊ शकते. याबाबत बोलताना ‘नॅशनल मिशन फॉर क्लिन गंगा’चे (एनएमसीजी) महासंचालक अशोककुमार म्हणाले की, ‘‘साधारपणे महिनाभरात ही मैला पाण्याच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होईल. आम्ही या प्रकल्पाची मथुरेतून सुरूवात करत आहोत. येथे दररोज दोन कोटी लिटर एवढे पाणी ‘आयओसीएल’ला देण्यात येईल. याच भागामध्ये ‘इंडियन ऑइल’चा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक राहिलेले मैला पाणी गरजेनुसार पुरविण्यात येईल. ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारपणे महिनाभराचा अवधी लागू शकतो. एखाद्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला मैला पाण्याची विक्री केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.’’ केंद्र सरकारने २०१५ मध्ये महत्त्वाकांक्षी ‘नमामि गंगे’ या प्रकल्पाला सुरूवात केली असून त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

पाणी शुद्ध झाले

गंगेतील अशुद्ध पाण्याचे येथील प्रकल्पामध्ये शुद्धीकरण करण्यात येईल. या प्रक्रियेनंतर जे मैलापाणी शिल्लक राहते त्याची उद्योगांना गरजेनुसार विक्री करण्यात येईल. प्रक्रिया केलेले पाणी हे स्नानासाठी वापरले जाऊ शकते असे याआधीच संशोधनातून स्पष्ट झाले आहे. याचा उद्योगांमध्ये सहज वापर केला जाऊ शकतो. यामुळे गंगेतील मूळ पाण्याचा उद्योगांकडून होणारा वापर देखील कमी होईल अशी आशा कुमार यांनी व्यक्त केली.

वनऔषधींचा प्रकल्प होणार

अनेक जलशुद्धीकरण केंद्रांची याआधीच उभारणी पूर्ण झालेली असून त्यांना केवळ आता विद्युत पुरवठा होत नसल्याने ते बंद अवस्थेत होते. शिवाय या प्रकल्पांमध्ये येणाऱ्या पाण्यावर देखील कुणाचेही लक्ष नव्हते. आता बरेचसे प्रकल्प पुन्हा सुरू झाले असून त्यात शिल्लक राहिलेले मैलापाणी उद्योगांना विकण्यात येईल. याच भागांमध्ये वनऔषधींचे प्रकल्प उभारण्याबाबत ‘मिशन गंगा’ची आयुष मंत्रालयासोबत बोलणी सुरू आहे.

गंगेच्या खोऱ्यामध्ये वनऔषधींची शेती चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना देखील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. गंगेपासून उत्पन्न मिळावे म्हणून आम्ही ‘अर्थ गंगा’ या प्रकल्पावर काम करत आहोत.

-अशोककुमार, संचालक, एनएमसीजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com