भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत राहिला. पण त्याच्या लढ्याला यश मात्र मृत्यूनंतर मिळालं.
शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. न्यायालयीन प्रक्रियेला लागणाऱ्या विलंबामुळे असं लोक म्हणतात. अनेकदा न्याय मिळतो पण खूप उशीर झालेला असतो. छत्तीसगढमधील एक व्यक्ती आयुष्यभर भ्रष्टाचाराच्या आऱोपाविरुद्ध लढला. त्याला १८ वर्षांनी न्याय तर मिळाला. न्यायालयाने त्याला निर्दोष असल्याचं घोषित केलं पण तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
छत्तीसगढमधील एक व्यक्ती भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त होण्यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत राहिला. पण त्याच्या लढ्याला यश मात्र मृत्यूनंतर मिळालं. न्यायालायने आता त्याला न्याय दिला आहे पण तो ऐकण्यासाठी संबंधित व्यक्ती जिवंत नाही. २१ महिन्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुर्ग जिल्ह्यातील शिव प्रसाद असं त्यांच नाव आहे.
शिव प्रसाद हे दुर्ग जिल्ह्यात फॉरेस्ट बिड गार्ड म्हणून काम करत होते. १९९९ मध्ये शिव प्रसाद हे लाकूड चोरीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी लाकूड जप्त केलं होतं. ज्यांच्यावर लाकूड चोरीचा आरोप होता त्यांनीच शिव प्रसाद यांच्यावर १ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.
शिव प्रसाद यांच्याविरोधात आरोपीने १ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केली होती. तेव्हा विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी शिवप्रसाद यांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली होती. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला शिव प्रसाद यांनी उच्च न्यायालयात २००३ मध्ये आव्हान दिलं.
उच्च न्यायालयात २००३ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या काळात शिव प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. डिसेंबर २०१९ मध्ये शिवप्रसाद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने शिव प्रसाद यांना सर्व आरोपातून मुक्त केलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.