
काश्मीर फाईल्स पाहून काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणतात, 'सगळं काही अर्धवट, नुसतीच हिंसा!'
रायपूर: सध्या 'काश्मीर फाईल्स' या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या कथित इतिहासावर वाद सुरु आहे. या चित्रपटाला सत्ताधारी भाजप आश्रय देत आहे तर विरोधकांकडून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप केला जातो आहे. विवेक अग्निहोत्रीचा काश्मीर फाईल्स चित्रपट (The Kashmir Files Movie) अल्पावधीतच लोकप्रिय झाला असून यामध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आला आहे. काल काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या सर्व आमदारांसह रायपूरमधील एका मॉलमध्ये चित्रपट पाहिला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटलंय की, 'काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारनने काश्मिरी पंडितांचे पलायन रोखण्याचा प्रयत्नच केला नव्हता, हे योग्यरित्या दाखवून दिलं आहे.
हेही वाचा: काँग्रेसला सर्वसमावेशी आणि सामुहिक नेतृत्वाची गरज; जी-२३ नेत्यांच्या बैठकीत चर्चा
बघेल यांनी पुढे म्हटलंय की, हा चित्रपट अर्धवट आणि दिशाभूल करणारी माहिती देणारा असून यामध्ये केवळ हिंसाचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 1989-90 च्या सुमारास व्हीपी सिंग पंतप्रधान होते आणि भाजप समर्थित सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट असूनही सैन्य पाठवले नाही, असा राजकीय संदेशही या चित्रपटातून मिळतो आहे. भाजपच्या पाठिंब्याने चालणाऱ्या सरकारने काश्मिरी पंडितांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांना निघून जाण्यास सांगितले, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तेथे सैन्य पाठवले नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी लोकसभेचा घेराव केला तेव्हा सैन्य पाठवले होते.
त्यांनी म्हटलंय की, या काश्मीर फाईल्स चित्रपटामधून कसलााही संदेश नाहीये, सगळं काही अर्धवट आहे. फक्त हिंसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपवाल्यांसमोर उभं रहावं तर ते पळून जातात. भाजपचा एकही व्यक्ती चित्रपट पहायला आला नाहीये.
हेही वाचा: गोव्याची सूत्रे प्रमोद सावंतांकडेच..!
अनेक भाजपशासित राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. भाजपकडून या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ट्विटरवरून हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली. ''भाजपाला काश्मीर पंडितांबद्दल प्रेम नाही. काश्मिरी पंडितांचं पलायन झालं त्यावेळी भाजप समर्थित व्ही. पी. सिंग सरकार होतं. काश्मीर फाईल्स चित्रपट समाजात दुही निर्माण करण्यासाठी बनवला आहे. यामागे भाजप आणि राजकीय डाव आहे. त्यामुळेच पंतप्रधानांसह सर्वजण या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत'', असे आरोप सचिन सावंत यांनी केला.
Web Title: Chhattisgarh Cm Bhupesh Baghel Watches Kashmir Files Film It Is Just An Attempt To Show Violence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..