
नवी दिल्ली- गलवानमधील संघर्षानंतर चीनच्या सीमेवरील कुरापती सुरूच असल्याने भारताने आज राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून ड्रॅगनला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. या चर्चेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात चीनने ताबा रेषेचा सन्मान करावा, असे म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक वू जियांगहो यांच्यात आज ही चर्चा पार पडली. याआधी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. पूर्व लडाखमधील लष्करी हालचालींबाबत भारताने चीनकडे चिंता व्यक्त केली असून पंधरा जून रोजी उभय देशांच्या लष्करांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाचा मुद्दाही या वेळी मांडण्यात आला. सीमेवरील वाद शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी मार्गाने चर्चा सुरू ठेवण्याबाबत दोन्ही देशांत मतैक्य झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शांतता, पारदर्शकतेचा चीनचा आग्रह
भारत आणि चीन हे दोघेही परस्परांचे महत्त्वाचे मित्र असून सीमेवर शांतता आणि पारदर्शकता कायम ठेवणे दोन्ही देशांसाठी हिताचे असून यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे चीनच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. चीनने नेहमीप्रमाणे कांगावा करताना पंधरा जून रोजी झालेल्या संघर्षास भारत कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. चिनी संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी म्हटले आहे की की, ‘‘ दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री या मुद्यावरून दूरध्वनीवरून चर्चा करत आहे.’’ विशेष म्हणजे या निवेदनाच्या प्रसारित झालेल्या इंग्रजी अंशामध्ये संरक्षणमंत्र्यांमधील चर्चेचा उल्लेख नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.