द्विपक्षीय कराराचे पालन करा भारताने चीनला ठणकावले!

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान हा इशारा
Comply with bilateral agreement S Jaishankar Wang Yi India China
Comply with bilateral agreement S Jaishankar Wang Yi India Chinaesakal

नवी दिल्ली : भारतासमवेत संबंध सुधारण्यासाठी ताबारेषेवरील सैन्य माघारी बोलवा आणि द्विपक्षीय करारांचे पालन करा, अशा स्पष्ट शब्दात भारताने चीनला ठणकावले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान हा इशारा दिला. तसेच, भारत आणि चीनचे संबंध परस्परांचा आदर, एकमेकांप्रती संवेदनशीलता आणि उभय देशांचे हित या तीन मुद्द्यांवर आधारित आहे, अशी जाणीवही करून दिली. जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोनदिवसीय बैठक बाली (इंडोनेशिया) येथे आज सुरू झाली आहे. या बैठकीसाठी गेलेले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची भेट घेतली.

यात लडाख सीमेवरील तणाव, द्विपक्षीय संबंध तसेच भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाचा मुद्दा यावर चर्चा झाली. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांची तासभर बातचीत झाली. अर्थातच, ताबारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये वाढलेला तणाव हा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ट्विट करून या बैठकीची माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी मे २०२० मध्ये ताबारेषेवर झालेली तणातणी आणि त्यानंतर गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांची झालेली हिंसक झटापट या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही चौथी बैठक आहे. सीमावादावर आणि चिनी सैन्याच्या घुसखोरीबद्दल भारताने ठाम भूमिका घेतली असून एप्रिल २०२० आधीची यथास्थिती ताबारेषेवर असावी असा भारताचा आग्रह आहे. याच मुद्द्यावर दोन्ही देशांच्या लष्करीपातळीवर अधिकाऱ्यांच्या वाटाघाटीच्या १४ फेऱ्या झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करताना जयशंकर यांनी पूर्व लडाखमध्ये ताबारेषेवरील प्रलंबित विषय तातडीने निकाली काढावे, असे आवाहन केले. काही संघर्ष बिंदूंवरील सैन्यमाघार झाली असली तरी सीमेवर शांतता आणि सलोखा राखण्यासाठी तसेच द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पूर्णपणे सैन्य माघार आणि द्विपक्षीय करारांचे पालन आवश्यक आहे, असेही त्यांनी ठणकावले. या भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी सीमावादावर शांततेने तोडगा काढण्यासाठी राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर वाटाघाटी सुरू ठेवण्यावर सहमती व्यक्त केली. तसेच कमांडर पातळीवरील वाटाघाटींची फेरी लवकरात लवकर घेण्याचेही ठरले. सोबतच, भारतीय विद्यार्थ्यांना चीनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये परतण्याची परवानगी मिळणे, व्हिसा मिळणे यासारखे मुद्देही जयशंकर यांनी उपस्थित केले.

चीनकडून भारताला सहकार्य

जी-२० देशांच्या बैठकीचे तसेच शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीचे यजमानपद भारताकडे आहे. या बैठका यशस्वी होण्यासाठी चीनने सहकार्य राहील, अशी ग्वाही चीनी परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने जी-२० देशांची बैठक केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये घेण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला असून चीननेही जम्मू-काश्मीरच्या कथित वादग्रस्ततेचा दाखला देत विरोधाचा सूर लावला आहे. त्यापार्श्वभूमीवर चीनी परराष्ट्र मंत्र्यांची ग्वाही उल्लेखनीय मानली जात आहे.

‘छाप्यांमुळे विश्वासाला तडा’

मोबाईल उत्पादक चिनी कंपनी व्हिवोच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच छापे घातले. त्यावर बोलताना चीनने म्हटले आहे, तपास यंत्रणा कायद्याचे पालन करीत चौकशी करतील, अशी आशा आहे. अशा छाप्यांमुळे देशात गुंतवणूक करणाऱ्या आणि काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो, असे भारतातील चीनी दूतावासाचे अधिकारी वँग शिओजियान यांनी म्हटले आहे. या प्रकरणात भारतातील घडामोडींवर चीनचे लक्ष आहे, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com