
कॉंग्रेस स्वतःच्या घराणेशाहीवर चिंतन करणार नाही !
नवी दिल्ली - कॉंग्रेस पक्षाने आपल्या सध्याच्या अवस्थेबद्दल चिंतन करायचे ठरविले हा त्या पक्षाचा प्रश्न. पण घराणेसाहीच्या कुप्रथेपासून पक्षाला कसे मुक्त करावे याचे चिंतन अर्थातच तेथे होणार नाही, किंबहुना तेथे तसे ते होऊच शकत नाही अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाने टोला लगावला आहे. ज्येष्ठ भाजप नेते, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी, भाजपसह हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पक्ष वगळले तर साऱयांनाच घराणेशाहीच्या वाळवीने पोखरले आहे असे मत व्यक्त केले. घराणेशाहीच्याच विषयावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने दिल्लीत १९ मे रोजी विशेष राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले की ‘देशाच्या राजकारणाला घराणेशाही असलेल्या पक्षांचा धोका‘ हाच या चर्चासत्राचा विषय आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे उद्घाटन होईल व जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांच्या उपस्थितीत समारोप होईल. कारण हा धोका देशाच्या लोकशाहीला आहे. देशातील २८५८ राजकीय नोंदणीकृत पक्षांपैकी मान्यताप्राप्त ५० ते ५२ पक्ष आहेत. देशात ८ राष्ट्रीय पक्ष आहेत व उर्वरीत प्रादेशिक पक्ष आहेत. यातील केवळ एक पंचमांश म्हणजे जेमतेम १० पक्षांमध्येच घराणेशाहीला स्थान नाही. बाकी सारेच म्हणजे ४० पेक्षा जास्त ‘घराणेबाज' पक्ष आहेत. तेथे पक्षांतर्गत लोकशाहीला वाव नाही. एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या मुलाला अपत्य झाले तरी ते तान्हे बाळही २०-२५ वर्षांनी त्या पक्षाचे सर्वेसर्वा होणार हे निश्चित असते. नंतर पक्ष ताब्यात घेणाऱया अशा नेत्यांकडे परिश्रम, विचार, चिंतन, अनुभव यांचा पूर्ण अभाव असतो. गरीबी, विषमता यासारख्या समस्यांशी त्यांना देणेघेणए उरत नाही कारण परिश्रमांविनाच सारे काही त्यांना मिळते.
महाराष्ट्रासारख्या राज्यात धर्मादाय आयुक्तांचा तशा संस्थांसाठीचा याबाबतचा नियम कडक आहे पण तेथील राजकीय पक्षांनी सोयीस्करपणे यातून स्वतःचा अपवाद करून घेतला आहे. हे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे व जगातील अनेक देशांना घराणेशाहीच्या रोगाने ग्रासले आहे. भारतात तर तिचे स्वरूप चिंताजनकच आहे. अशी घराणेशाही हे त्या पक्षातील कऋतर्त्ववान नेत्यांबरोबरच देशाच्या मतदारांवरही अन्यायकारक आहे. लोकशाहीत निवडीचा अधिकार घराणेशाहीमुळे निष्प्रभ होतो हे ओळखूनच राज्यघटनाकारांनी राजकीय घराणेशाही साफ नाकारली. त्या घटनादत्त तत्वाशीही या पक्षांतील घराणेशाही विसंगत आहे.
डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले की भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांचे शिबिर राजस्थानात होत आहे. मात्र कांग्रेसने तेथे शिबिर घेतले म्हणून भाजपने घेतले असे म्हणणे पूर्वग्रहदूषीत ठरेल. घराणेशाहीवर बोलताना त्यांनी खुद्द भाजपमधील हिमाचल प्रदेशापासून राजस्थानपर्यंतच्या घराणेशाहीचा उल्लेख टाळला. ते म्हणाले की या एक दिवसीय चर्चासत्रात थंबी दुराई (अण्णाद्रमु), आरसीपी सिंह (संयुक्त जनता दल), जे एन वैश्य (आसाम गण परिषद) या नेत्यांबरोबरच विविध क्षेत्रातील सर्वश्री संदीप शास्त्री, आनंद रंगनाथन, जे साई दीपक या विचारवंतांचेही घराणेशाहीच्या धोक्याबद्दलचे विचार एकायला मिळतील.
तो तर निव्वळ योगायोग !
तीन मूर्ती भवनातील नेहरू संग्रहालयात हा कार्यक्रम होणार आहे. भाजप व संघपिरवाराने २०१४ पासून देशातील राजकीय घराणेशाहीबद्दल पंडित नेहरूंवर प्रचंड टीकास्त्र सोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी म्हाळगी प्रबोधिनीने निवडलेले ठिकाण व चर्चासत्राचा विषय (घराणेशाही) हा योगायोग आहे का, या प्रश्नावर सहस्त्रबुध्दे यांनी तसे काही नाही.पण तुम्ही तसे समजू शकता असे उत्तर दिले. राजधानीतील हे एतिहासिक नेहरू संग्रहालय ही एखाद्या कुटुंबाची खासगी नव्हे तर राष्ट्राचे, जनतेच्या हक्काचे ठिकाण आहे असेही ते म्हणाले.
Web Title: Congress Chintan Congress Will Not Think Of Its Own Dynasty Bjp Vinay Sahasrabuddhe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..